RBI Gold Bar: देशातील चलनव्यवस्था चालवण्यापासून त्यासंदर्भातील निर्णय घेण्यापर्यंतचे सर्व महत्त्वाचे अधिकार हे देशाच्या सर्वोच्च बँकिंग प्रणाली अर्थात आरबीआयकडे असतात. याच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोन्याचीही एक मोठी ठेव आहे. आरबीआयमध्ये सोन्याची नेमकी किती ठेव आहे हे जाणून घेण्यासाठी काही वर्षे मागे जावं लागेल.
साधारण 35 वर्षांपूर्वी डोकावून पाहिल्यास एक महत्त्वाची गोष्ट आढळते. 1991 च्या आर्थिक संकटानंतर त्या वर्षापासून ते आतापर्यंत आरबीआयच्या सोन्याच्या ठेवीत मोठी भर पडली आहे. हा तोच काळ होता जेव्हा आरबीआयनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत तब्बल 21 हजार किलो किमतीचं सोनं देशाबाहेर पाठवलं होतं. ज्यावेळी वृत्तपत्रांमध्ये हे वृत्त 'Secret Sale of Gold' या मथळ्याअंतर्गत छापण्यात आलं होतं.
मुंबईस्थित आरबीआय बँकेच्या कार्यालयातून काही एम्बेसेडर गाड्यामधून सोनं विमानतळांवर आणण्यात आलं होतं. जिथं एका विशेष विमानानं हे सोनं लंडनला पाठवण्यात आलं होतं. त्या काळात भारताच्या पेमेंट बॅलेन्समध्ये घोळ झाला असून ही त्रुटी सरकारसह इतर संस्थांच्या मदतीनं भरुन काढण्यात आली होती, मात्र त्या वेळी परिस्थिती इतकी बिघडली होती, की आयातशुल्क भरण्यासाठी फक्त तीन आठवड्यांचंच परदेशी मुद्रा भंडार शिल्लक होतं.
तिथं आयएमएफ मुख्यालयात चर्चा करण्यासाठी आरबीआयची टीम पोहोचली. दिवसरात्र बैठकांची सत्र सुरू झाली आणि त्याचदरम्यान चंद्रशेखर यांचं सरकार पडल्याचं वृत्त आलं. भारतीय प्रतिनीधींनी आयएमएफला आश्वस्त करण्यात यश मिळवलं मात्र तत्कालीन संकटातून देशाला तारण्यासाठी आर्थिक मदतही अपेक्षित होती. त्यावेळी आरबीआयनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडून 405 मिलियन डॉलर इतकी आर्थिक जुळवाजुळव अर्थात कर्जाची व्यवस्था केली. मात्र भविष्यात त्याची मोठी परतफेडही भारताला करावी लागली.
भारताला नाईलाजानं तब्बल 21000 किलो सोनं गहाण ठेवावं लागलं. 1991 मध्ये गहाण ठेवलेलं हे सोनं भारतानं अवघ्या 6 महिन्यांमध्ये सोडवलं. याच सोन्याच्या बळावर मिळालेल्या कर्जानं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला आणि देशात सकारात्मक बदल दिसून आले.
आरबीआय देशातील सोन्याच्या एका मोठ्या साठ्याची संरक्षक संस्था आहे. अतिशय सुरक्षित ठिकाणी हे सोनं ठेवलं जात असून तिथं अनेकांना प्रवेश निषिद्ध असतो. आरबीआयमध्ये असणारं सोनं विटांच्या स्वरुपात असल्याचं सांगितलं जातं. जिथं प्रत्येक विट साधारण 12.50 किलोंची असते असंही म्हटलं जातं. उपलब्ध माहितीनुसार भारतात सध्या साधारण 870 टनहून अधिक सोन्याचा साठा आहे. खुद्द आरबीआयच्याच माहितीनुसार अर्थव्यवस्थेचा आलेख वरखाली होत असतो. मात्र सोनं जैसे थे राहतं आणि याच सोन्याच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था कमालीची भक्कमही राहते.