Marathi News> भारत
Advertisement

देशातील 5 मोठ्या बँकांवर RBIची कारवाई, ग्राहकांवर काय होईल परिणाम?

RBI Against Bank: आरबीआयने देशातील 5 मोठ्या बँकांवर दंड ठोठावलाय. 

देशातील 5 मोठ्या बँकांवर RBIची कारवाई, ग्राहकांवर काय होईल परिणाम?

RBI Against Bank: नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी देशातील अनेक बँकांना दंड आकारते. आता आरबीआयने देशातील 5 मोठ्या बँकांवर दंड ठोठावलाय. यामध्ये देशातील आघाडीच्या बँका आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे. कोणत्या बँकेवर किती दंड आकारण्यात आलाय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

आयसीआयसीआय बँकेला 97.20 लाखांचा दंड

देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेला आरबीआयने एकूण 97.20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी, क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल आयसीआयसीआय बँकेवर हा दंड ठोठावण्यात आलाय.

अ‍ॅक्सिस बँकेला 29.60 लाख रुपयांचा दंड

देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेला आरबीआयने 29.60  लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. ऑफिस खात्यांच्या अनधिकृत कामकाजाबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल अ‍ॅक्सिस बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयडीबीआय बँकेला 31.8 लाख रुपयांचा दंड

आरबीआयने आयडीबीआय बँकेला एकूण 31.8 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेती आणि संबंधित कामांसाठी दिलेल्या अल्पकालीन कर्जावरील व्याज अनुदानाशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल आयडीबीआय बँकेवर हा दंड ठोठावण्यात आलाय.

बँक ऑफ बडोदाला 61.40 लाख रुपयांचा दंड

बँक ऑफ बडोदाला आरबीआयने एकूण 61.40  लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. बँकेत असलेल्या वित्तीय सेवा आणि ग्राहक सेवा काउंटरवर जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बीओबीवर हा दंड ठोठावण्यात आलाय.

बँक ऑफ महाराष्ट्रला 31.80 लाख रुपयांचा दंड

आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रला एकूण 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. केवायसीशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रवर हा दंड ठोठावण्यात आलाय.

ग्राहकांवर काय होणार परिणाम? 

काही बँका नियमांचे पालन करत नाही. अशावेळी ग्राहकांचे भविष्यकालिन हित लक्षात घेता आरबीआयकडून अशा बँकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. बँकांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यास बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा अधिकारसुद्धा आरबीआयला आहे. या सर्वात ग्राहक म्हणून आमच्यावर काय परिणाम होणार? असा प्रश्न विचारला जातोय. तर आरबीआयच्या या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही. 

बँकांनी नियमांचे पालन न केल्याने देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे दंडाची रक्कम ही केवळ बँकेकडून वसूल केली जाणार आहे. ग्राहकांना ही रक्कम भरावी लागणार नाही. तसेच या कारवाईमुळे बँक आणि ग्राहकांमधील व्यवहारांवर कोणताच परिणामदेखील होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही.

Read More