Penalty on banks by RBI : सलग दोन वर्षे मोठ्या प्रमाणात तोटा झाल्यानं न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँकेची दखल घेत आरबीआयनं या बँकेच्या काही व्यवहारांवर निर्बंध लागू केले आहेत. पुढील सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँकेनं लागू केलेले हे निर्बंध कायम राहणार असून यामुळं आता खातेदार आणि ठेवीदार अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील सर्वच बँका आणि आर्थिक संस्थांच्या कार्यवाहीवर करडी नजर ठेवणाऱ्या आरबीआयनं आतापर्यंत अनेक बँकांना शासन घडवलं आहे.
आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्यास वेळीच काही बँकांचा परवानाही रद्द करण्यात आला असून यामध्ये आणखी काही बँकांची नावं जोडण्यात आली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता नैनिताल बँक (Nainital Bank) आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) वर एकूण 68.1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयच्याच वतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार कर्जावरील व्याजदर आणि बँकांच्या कस्टमर सर्विससंदर्भातील निर्देशांचं पालन न केल्यामुळं नैनिताल बँक लिमिटेडवर 61.40 लाखांचा दंड लावण्यात आला आहे. तर, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेवर 6.70 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. याआधी आरबीआयनं आयसीआयसीआय (ICICI) आणि एचडीएफसी (HDFC) बँकांवरही अशाच प्रकारची कारवाई केली होती.
देशातील केंद्रीय बँक संस्थेनं ही कारवाई केल्यानंतर आता खातेधारकांना आपल्या खात्यातील रक्कम काढता येणार नाहीय. पुढील 6 महिन्यांसाठी हे निर्बंध लागू राहणार असून, बँकेच्या व्यवहारांचं निरीक्षण केल्यानंतर आणि बँकांकडे असणारी किमान रोकड पाहता ते लागू करण्यात आल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहचा ठेवीदारांच्या खात्यासह करंट अकाऊंटमधून किंवा इतर कोणत्याही खात्यातून रक्कम काढण्यास परवानगी दिली जाऊ नये अशा सूचना आरबीआयनं केल्या आहेत.
आरबीआयच्या वतीनं एनबीएफसी श्रीराम फायनान्सवरबी 5.80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, या बँकेवर केवायसी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया आणि क्रेडिटसंदर्भातील माहितीबाबतच्या नियमांचं पालन न केल्यामुळं हे नियम लागू करण्यात आले आहेत.