Bank News : भारतातील सर्व बँकांच्या कार्यकारिणीवर आणि कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं आतापर्यंत अनेकदा बँकांना चुकीच्या कार्यवाहीसाठी आणि उणिवांसाठी शिक्षा किंवा दंड ठोठावल्याचं आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता यामध्ये आणखी तीन बड्या बँकांचा समावेश असून, अनेकांचीच खाती असणाऱ्या या बँकांवरील कारवाईमुळं आपल्या ठेवींवर काही परिणाम तर होणार नाही? हा एकच प्रश्न सामान्य खातेधारकांना सतावत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकतंच नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. नुकतीच देशातील सर्वोच्च बँकिंग संस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली.
RBI नं जारी केलेल्या माहितीनुसार (Kotak Mahindra) कोटक महिंद्रा बँकेकडून 'कर्ज वितरणासाठी कर्ज प्रणाली'चे निर्देश तसंच 'कर्ज आणि आगाऊ वैधानिक', इतर निर्बंधांसंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यामुळं बँकेला 61.4 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, 'बँकांमधील ग्राहक सेवा' संदर्भात आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं (PNB) पंजाब नॅशनल बँकेवर 29.6 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरबीायकडूनच जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार Know Your Customer - KYC संदर्भातील काही सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी आयडीएफसी फर्स्ट बँकेला (IDFC First) आरबीआयनं 38.6 लाखांचा दंड ठोठावला आहे. वरील तिन्ही बँकांवर ही कारवाई करत असतानाच त्याची सर्वतोपरि जबाबदारी बँकांची असून, आरबीआयनं सांगितल्यानुसार बँकांच्या खातेधारकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही याची नोंद घ्यावी.
आरबीआयकडून बँकांवर कारवाी केली जाणारी ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा एचडीएफसी, आयसीआयसीआय या आणि अशा अनेक मोठ्या बँकांवर आरबीआकडून कारवाईचा बडगा उचलला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. आखून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याची बाब लक्षात येताच आरबीआय बँकांना शासन घडवताना दिसते. दरम्यान यामध्ये खातेधारकांना यामुळं कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षतासुद्धा बँकेकडून घेण्यात येते.