IAS Studies : केंद्र किंवा मग राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारा एक मोठा वर्ग आपल्या आजुबाजूला असतो. कोणी नोकरी, कुटुंब सांभाळून, कोणी मेहनतीची कामं करून, कोणी पूर्ण वेळ या परीक्षेच्या तयारीसाठीच देत अभ्यास करत असतो. तर, काही मंडळी या परीक्षेसाठी विशेष शिकवणी वर्गांचीसुद्धा मदत करतात. मार्गदर्शकांचे सल्ले ऐकतात. अशाच मंडळींच्या यादीत येणारं आणि या वर्तुळात चर्चेत असणारं एक नाव म्हणजे डॉ. विकास दिव्यकिर्ती.
सध्या सोशल मीडियावर दिव्यकिर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात ते परीक्षार्थींना दिवसभराचाच अभ्यास पुरेसा नाही, असं सांगताना दिसत आहेत. 'मी मुलाना अगदी पहिल्या दिवशीच सांगतो, ती 8 तास अभ्यास करा, 8 तास झोपा आणि 8 तास मजामस्ती करा तरीही तुम्ही IAS बनू शकाल', असं ते म्हणाले. परीक्षार्थींनी संतुलित दिनक्रम ठेवत परीक्षेची तयारी करावी असा संदेश ते देतात.
दिव्यकिर्ती यांच्या विचारानुसार विद्यार्थ्यांना कायमच त्यांची एक वेगळी दिनचर्या आखण्याची गरज असून, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ते सुदृढ राहिले तरच परीक्षेचा टप्पा ते ओलांडू शकतात. त्यांच्या विचारानुसार आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रचंड मेहनतीचा असून, त्यासाठी परीक्षार्थींना स्वत:हूनच प्रचंड मेहनत करावी लागते.
परीक्षेसंदर्भातील काही वास्तववादी गोष्टीसुद्धा त्यांनी नाकारल्या नसून, या परीक्षेत काही विषयांची 'घोकंपट्टी'च करावी लागते, जिथं अनेकदा काहीही तर्क लागू होत नाहीत असंच त्यांचं मत. दिव्यकिर्ती यांनी आतापर्यंत कायमच व्यावहारिक दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केलं असून त्यांचा हाच अंदाज या वर्तुळात त्यांना कमालीची लोकप्रियता देऊन गेला आहे.
सोशल मीडियावरही दिव्यकिर्ती यांचे णअनके व्हिडीओ व्हायरल होत असतात. आश्चर्याची बाब म्हणजे परीक्षार्थी आणि खुद्द इतर मार्गदर्शकरांकडूनही दिव्यकिर्ती यांच्या या विचारांना दुजोरा दिला जात असून, या परीक्षेची तयारी करू पाहणाऱ्यांना त्यामुळं संतुलित आणि व्यावहारिक दृष्टीकोन मिळत आहे.