Marathi News> भारत
Advertisement

'संदीप 26/11 चा पीडित नाहीये,' मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं, 'तहव्वूर राणाला आणणे हे काही...'

Tahawwur Rana Extradition: मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी ताजमहलमध्ये 10 कमांडोच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. यादरम्यान दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत ते शहीद झाले.   

'संदीप 26/11 चा पीडित नाहीये,' मेजर संदीप उन्नीकृष्णनच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं, 'तहव्वूर राणाला आणणे हे काही...'

Tahawwur Rana Extradition:  मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (National Security Guard) मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या वडिलांनी तहव्वूर राणाचं भारतात होणारं प्रत्यार्पण हे राजनैतिक यश नसून, सर्वसामान्य लोकांसाठी घेतलेला बदला असल्याची भावना व्यक्त केली आहे. एनडीटीव्हीशी फोनवर बोलताना के उन्नीकृष्णन म्हणाले की, राणाच्या प्रत्यार्पणामुळे गुन्हा सिद्ध होत नाही आणि 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली यालाही परत आणण्याची गरज आहे.

मुंबईत दहशतवादी ताजमहल हॉटेलमध्ये घुसल्यानंतर 31 वर्षीय मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी 10 कमांडोंच्या टीमचं नेतृत्व केल होतं. हॉटेलमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी कमांडोंच्या पथकावर गोळीबार केला होता. मेजर उन्नीकृष्णन यांनी त्यांच्या जखमी सहकाऱ्यांना बाहेर काढलं आणि एकट्याने दहशतवाद्यांचा पाठलाग केला. हॉटेलच्या उत्तरेकडील भागात दहशतवाद्यांना अडकवण्यात ते यशस्वी झाले. दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत ते मारले गेले. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शेवटच्या क्षणी "वर येऊ नका, मी त्यांना हाताळेन" असं सांगितलं होतं. 

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. "मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी सौहार्द आणि सर्वोच्च दर्जाचे नेतृत्व याशिवाय सर्वात उल्लेखनीय शौर्य दाखवले आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले," असं प्रशस्तिपत्रात म्हटलं आहे.

16 वर्षांनी शहीद संदीप यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शौर्याबद्दल भाष्य करताना म्हटलं आहे की, "संदीप हा 26/11चा पीडित नाही. तो एक सुरक्षा कर्मचारी होता ज्याने मृत्यूला तोंड देत आपले कर्तव्य चोख बजावलं. त्याला खात्री होती की तो परत येणार नाही. जर त्याने मुंबईत हे केलं नसतं तर दुसरीकडे कुठेतरी केले असते. आपली मुख्य चिंता असा हल्ला रोखण्याची असली पाहिजे, जेणेकरून आपण या लोकांना होणारे नुकसान कमी करू शकू," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे काही समाधान झालं का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, "नक्कीच हे यश आहे. सर्वसामान्यांसाठी हे फक्त राजनैतिक यश नाही तर बदल आहे. आपण गुन्हेगाराला पकडू शकतो".

राणाला ताब्यात घेण्यात भारताला मिळालेल्या यशामुळे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 पीडितांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल का? या प्रश्नावर ते म्हणाले, "यामुळे सगळं काही संपत नाही. आपल्याला कोलमन हेडलीला पकडावे लागेल. हे सर्व प्यादे आहेत, जे पैशासाठी काम करत आहेत. आपल्या शेजारील काही एजन्सींच्या इशाऱ्यावर हे काम करण्यात आलं. परंतु त्यामागे असणारे मेंदू, जरी सर्व काही संशयापलीकडे सिद्ध केले असले तरी आम्ही अद्याप त्यांना स्पर्श केलेला नाही. परंतु हे निश्चितच एक यश आहे, जरी उशीर झाला तरी. आणि मला आशा आहे की सर्वांना शिक्षा होईल."

राणाला परत आणणारे एक विशेष विमान आज दुपारी दिल्लीत उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर, राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी त्याची चौकशी करतील. एनआयए प्रत्येक गोष्टीची तपासणी करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "हा (राणा) प्रशिक्षित आहेत. एनआयएकडे सगळी माहिती आहे, ते फक्त त्याची वाट पाहत आहेत. आता त्यातून काय बाहेर येतं ते पाहूयात".

Read More