Uddhav Thackeray On Alliance With MNS Chief Raj Thackeray: दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीसंदर्भात सूचक विधान केलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला असता दिल्लीमध्ये दिल्लीतील म्हणजेच केंद्रीय नेतृत्वासंदर्भातील प्रश्न अन् मुंबईच्या प्रश्नांवर मुंबईत बोलू अशी भूमिका घेतली. त्यानंतरही पत्रकारांनी राज यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी संभाव्य युतीसंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं.
दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव यांनी आज सकाळी दिल्लीतील 15 सफदरजंग लेन येथील खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना, "दिल्लीत अधिवेशनात मी येत असतो. आपण भेटत असतो," असं सांगताना हा नियमित दौरा असल्याचं म्हटलं. तसेच इंडिया आघाडीची चर्चा झाल्यानंतर सांगतो. लोकसभेनंतर आम्ही पहिल्यांदाच भेटतोय असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातही उद्धव यांना विचारण्यात आलं. त्यावर जेव्हा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा शक्यता पडताळून पाहू, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं. उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढलं? ते आत्ता आहेत कुठे यावर चर्चा झाली पाहीजे, असंही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेप्रमाणेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी, "गद्दार हा गद्दार असतो. त्यांच्या मताला मी किंमत देत नाही," असं म्हणत उत्तर देणं टाळलं. पुढे, "ते त्यांच्या मालकांना भेटायला आले असतील," असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. "ट्रम्प आपल्या देशाची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहेत. मग आपला देश चालवतोय कोण? मी म्हणालो होतो, आज देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांची गरज आहे. पण आजचे पंतप्रधान भाजपचे आहेत. हे भाजपचे प्रचारमंत्री आहेत," असा टोला ठाकरेंनी मोदींचा थेट उल्लेख टाळत लगावला.
राज ठाकरेंसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरेंनी, मुंबईच्या प्रश्नांवर मुंबईत बोलू असं विधान केलं. थोड्या वेळाने पुन्हा राज यांच्यासोबतच्या युतीसंदर्भात विचारण्यात आलं असता, "(युतीसंदर्भातील) कोणताही निर्णय घेण्यास आम्ही दोघे (राज आणि उद्धव) समर्थ आहोत," असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ होतोय. देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? दिल्ली, आसाममध्ये आंदोलनं झालं होतं. ईव्हीएमवर आमचा आक्षेप असताना आता व्हिव्हिपॅट काढण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणत उद्धव यांनी व्हिव्हिपॅटच्या निर्णयाला आमचा विरोध असल्याचं सूचित केलं.
"पाकिस्तान आपला शत्रू आहे. आम्ही यापूर्वी मॅच थांबवल्या होत्या. सुषमा स्वराज पण बोलल्या होत्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये. जय शाह यांच्यासह अनेक लोक पाकिस्तान सोबत क्रिकेट होण्याबाबत पुढाकार घेत आहेत. ते सच्चे देशभक्त नाहीत," असा टोला ठाकरेंनी लगावला.
> उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा कशासाठी?
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, हा त्यांचा नियमित दौरा आहे आणि ते अधिवेशनासाठी दिल्लीत येत असतात. तसेच, इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ते अधिक माहिती देतील, असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी म्हटलं की, लोकसभेनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.
> राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चेबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी युतीसंदर्भात थेट उत्तर देणं टाळलं, पण त्यांनी सूचकपणे सांगितलं की, “मुंबईच्या प्रश्नांवर मुंबईत बोलू.” तसेच, “आम्ही दोघे (उद्धव आणि राज) युतीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यास समर्थ आहोत,” असं म्हणत युतीच्या शक्यतेचा इशारा दिला.
> एकनाथ शिंदेबाबत उद्धव ठाकरे यांनी काय टिप्पणी केली?
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी खोचकपणे उत्तर दिलं, “गद्दार हा गद्दार असतो. त्यांच्या मताला मी किंमत देत नाही.” तसेच, “ते त्यांच्या मालकांना भेटायला आले असतील,” असा टोला त्यांनी लगावला.