Amit Shah on Pahalgam Terror Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी आणि कट आखणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेऊन त्याला ठार केलं जाईल असा जाहीर इशारा दिला आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. दिल्लीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह यांनी सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. दहशतवाद्यांसाठी वाईट वेळ येणं अजून बाकी आहे असं अमित शाह म्हणाले आहेत.
"ज्याने कोणी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला आहे, त्याला सोडणार नाही. आम्ही हल्ल्यासाठी जबाबदार प्रत्येकाला शोधून काढू आणि ठार करु. 26 लोकांना ठार करुन आपण जिंकलो असं समजू नका. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी भाग पाडलं जाईल," असं अमित शाह यांनी आसामच्या बोडो समुदायाचे नेते उपेंद्र नाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या आणि त्यांच्या नावावर एका रस्त्याला नाव देण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात म्हटलं.
"प्रत्येकाला निवडून निवडून उत्तर दिलं जाईल. हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. देशाच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा निर्धार असून, तो पूर्ण होईल," असंही ते म्हणाले आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इतर अधिकाऱ्यांसह दहशतवादी हल्ल्यातील मृतांसाठी आदरांजली म्हणून मौन पाळलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य प्रमोद बोरो यांनीही दिल्ली कार्यक्रमाला उपस्थिती लावली.