Crime News Fake Embassy: भारत एवढा मोठा देश आहे की इथे काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं. खास करुन फसवणुकीची रोज अशी नवीन प्रकरणं समोर येत असतात की आरोपींनी हीच बुद्धी चांगल्या कामासाठी वापरली असती तर ते अधिक यशस्वी झाले असते असं वाटून जातं. असाच काहीसा प्रकार सध्या उत्तर प्रदेशमध्ये समोर आला असून इंटरनेटवर त्याची जोरदार चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एका अस्तित्वात नसलेल्या देशाच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा एका इसमाने केला असून मागील सात वर्षांपासून या बेकायदेशीर उद्योग सुरु होता अशी माहिती समोर आली आहे.
प्रत्येक देशाचा मोठ्या देशामध्ये एक दुतावास असतो. राजकीय हितसंबंध जपण्यापासून ते आपल्या देशातील नागरिकांना काही अडीअडचणी आल्या तर ते दुतावासाची मदत घेऊ शकतात. मात्र उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये जगाच्या पाठीवर अस्तित्वातच नसलेल्या अनेक देशांचा दूतावास मागील सात वर्षांपासून कार्यरत होता. या दूतावासाच्या माध्यमातून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये गाझियाबाद पोलिसांनी हर्षवर्धन जैन नावाच्या इसमाला अटक केली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पथकाने हर्षवर्धन जैनविरोधात कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी व आंतरराष्ट्रीय शस्त्रविक्रेता अदनान खाशोगी यांच्याशीही हर्षवर्धन जैनचे लागेबांधे होते, असे उघड झाले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी यासंदर्भातील माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
गाझियाबादच्या कवीनगर परिसरात राहणाऱ्या हर्षवर्धन जैन याने एका दुमजली भाडोत्री इमारतीमध्ये हा खोटा दूतावास थाटला होता. गेल्या सात वर्षांपासून त्याचा हा फसवणुकीचा धंदा सुरू होता, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ यश यांनी
सांगितले. वेस्ट आक्टिंका तसेच, साबोर्गा, पॉल्व्हिया आणि लंडनिया या काल्पनिक देशांचा राजदूत असल्याची बतावणी तो करायचा आणि लोकांना येथे जाण्यासंदर्भातील मदत करतो सांगत गंडा घालायचा. पोलिसांना छापेमारीदरम्यान 34 खोट्या आणि खऱ्या देशांचे स्टॅम्प्स सापडले आहेत.
हर्षवर्धन जैन वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी व आंतरराष्ट्रीय शस्त्रविक्रेता अदनान खाशोगी यांच्याही संपर्कात होता, असे चौकशीत आढळले आहे. या घोटाळ्यातील पैसे हवाला रॅकेटमार्फत देशाबाहेर पाठवणे, बनावट कंपन्या स्थापन करणे आदी आरोपही जैनवर करण्यात आले आहेत. बेकायदा सॅटेलाइट फोन बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर सन 2011 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.