Weather News : देशात उत्तर भारतीय राज्यांमध्ये धुळीचं वादळ आलं असून, दिल्लीपासून राजस्थानपर्यंत या वादळाचे परिणाम पाहायला मिळत आहेत. तर काही राज्यांमध्ये जोरदार पावसां हजेरी लावल्यामुळं नागरिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढचे 24 तास पूर्वोत्तर आणि उत्तरेकडील राज्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात.
जम्मू काश्मीर, गिलगिट, बाल्टीस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड; दक्षिण भारतात कर्नाटकचा किनारपट्टी भाग, केरळ आणि अंदमान निकोबर बेट समुहावर पावसाच्या सरींचा मारा होईल, सध्याच्या घडीला देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालं असून, पुढचे तीन दिवस म्हणजे देशाच्या ईशान्य, वायव्य, दक्षिण आणि मध्य क्षेत्रात येणाऱ्या जवळपास 20 राज्यांना धोक्याचा इशारा देत इथं पावसाचा तूफान मारा होणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात हवेचा वेग ताशी 40 ते 70 किमीदरम्यान राहण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 1 ते 4 जूनदरम्यान वेगवेगळ्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पंजाब आणि हरियाणामध्ये तीन जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान पर्वतीय भागांमध्ये भूस्खलनाची भीती असल्यानं यंत्रणाही लहानमोठ्या घटनांवर लक्ष ठेवून आहेत.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि ताशी 70 किमी इतक्या प्रचंड वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. या काळात, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही यंत्रणांनी केलं आहे. मोठाले वृक्ष यादरम्यान हेलकावे खाण्याची शक्यता असून या वादळसदृश्य परिस्थितीच्या धर्तीवर सध्या यंत्रणाही सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.
आयएमडीनं जूनच्या सुरुवातीपासूनच आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, इथं वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.