Marathi News> भारत
Advertisement

श्रीकृष्णावर निरंतर प्रेम करणाऱ्या राधेचा पती कोण होता?

Radha Krishna : जेव्हा जेव्हा प्रेमाचा मुद्दा येतो, आणाभाका घेतल्या जातात किंवा नितांत प्रेम म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो तेव्हा एक जोडी कायमच डोळ्यांसमोर येते... ती म्हणजे राधा-कृष्णाची...   

श्रीकृष्णावर निरंतर प्रेम करणाऱ्या राधेचा पती कोण होता?

Radha Krishna : राधा-कृष्णाच्या जोडीचं नाव घेतलं तरी प्रेमाचं एक सुरेख रुप डोळ्यांसमोर उभं राहतं. प्रेम म्हणजे नेमकं काय हे भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या नात्यानं दाखवून दिलं आणि युगानुयुगांपासून या नात्यानं जणू प्रेमाच्या नात्याचा पायाच रचला. अशा या निरंतर नात्याचं पुढे नेमकं काय झालं? श्रीकृष्णाच्या लग्नाविषयी कायमच बोललं गेलं पण, राधेचं पुढे नेमकं काय झालं याची मात्र फार कमी चर्चा झाली. 

ब्रह्मवैवर्त पुराणातील एका कथेनुसार श्रीकृष्णासमवेत राधा गोलोकात वावरत होती. एके दिवशी तिच्या अनुपस्थितीमध्ये कृष्ण दुसरी पत्नी विरजासमवेत भ्रमण करत होता. तेव्हाच तिथं राधा आली आणि विरजावर नाराज होऊन तिथून निघून गेली. कृष्णाचा मित्र आणि सेवक श्रीदामाला राधेचं हे वागणं न रुचल्यानं त्याने तशी नाराजी व्यक्त केली आणि राधेनं संतापत श्रीदामाला पुढल्या जन्मी शंखचूड नामक राक्षसाच्या रुपात जन्म होण्याचा शाप दिला. ज्यावर श्रीदामानं राधेला पृथ्वीलोकात मनुष्यरुपात जन्म घेण्यासंदर्भात 100 वर्षांच्या कृष्ण वियोगाचा शाप दिला. 

पद्मपुराणानुसार राधा ही वृषभानू नामक एका गोपी कुटुंबातील लेक होती. तिच्या आईचं नाव किर्ती होतं. राधेची ओळख होती वृषभानू कुमारी. बरसाना हे राधेच्या वडिलांचं निवासस्थान होतं. काही विद्वानांच्या मते राधारानीचा जन्म यमुना नदीनजीक रावल गावात झाला होता आणि त्यानंतर तिचे आईवडील तिला बरसाना इथं घेऊन गेले. (याविषयी काही मतमतांतरं आढळतात.)

असं म्हणतात की नृगपुत्र राजा सुचंद्र आणि मानसी कन्या कलावतीनं 12 वर्षांच्या तपश्चर्येतून ब्रह्मदेवाकडून आशीर्वादाच्या स्वरुपात पुत्री प्राप्त केली होती. याचाच परिणाम म्हणजे द्वापारयुगात त्या दोघांनाही वृषभानू आणि किर्तीच्यारुपात जन्म मिळून राधेनं त्यांच्या पोटी जन्म घेतला. 

राधेचा विवाह कोणासोबत झाला होता? 

ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंड 2 च्या अध्याय 49 मधील श्लोक 39 आणि 40 नुसार राधा मोठी झाल्यानंतर तिच्या आईवडीलांनी अयान (रायाण) नामक एका वैश्याशी तिचं नातं निश्चित केलं. त्याचवेळी राधेनं घरात आपली छाया स्थापित करत ती अंतर्धान पावली. त्याच छायेसह अयानशी तिचा विवाह पार पडला. याच श्लोकात असाही उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्णाची आई यशोदा ही अयानची नात्यानं बहीण लागत होती. त्यामुळं अयान नात्यानं कृष्णाचा मामा होता. त्याला रापाण, किंवा अयान, अयनघोष या नावांनीही ओळखलं जात असे. हा रायाण गतजन्मी श्रीकृष्णाचाच गोप होता. 

एकदा अयाननं लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली आणि विष्णूनं प्रसन्न होत त्याला लक्ष्मीच्या रुपात राधा तुझी पत्नी होईल असा आशीर्वाद त्याला दिला. याच आशीर्वादामुळंही राधेचं लग्न अयानशी झाल्याचं पौराणिक कथांमध्ये सांगितलं आहे.

पृथ्वीलोकात राधेचा विवाह श्रीकृष्णाची झाला नसला तरीही वास्तवात श्रीराधा मूळ रुपात मात्र वृंदावनात कृष्णाच्याच सोबत होती असं पौराणिक कथा सांगतात. अशी मान्यता आहे की राधाकृष्णाचं लग्न खुद्द ब्रह्मदेवानं लावलेलं, ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या सोहळ्याचा समस्त देवदेवता उपस्थित होते. तर, पृथ्वीलोकात मात्र राधेच्या छायेचा विवाह अयानसोबत झाला होता. 

(वरील माहिती पुराणकथांमधील संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Read More