Confirm Rail Ticket: लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर तो आरामदायी व्हावा म्हणून लाखो भारतीय ट्रेनचा पर्याय निवडतात. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेकडून अनेक निर्णय घेतले जातात. जेव्हा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुकिंग करत असाल तर आता ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी नव्हे तर 24 तास आधी तुम्हाला तुमची सीट कन्फर्म झाली की नाही याची माहिती मिळणार आहे.
तुम्ही रेल्वेनं प्रवास करताना तुमचं आरक्षित तिकीट असेल तर ते वेटिंग असतं.प्रवासाच्या काही तास आधीपर्यंत तिकीट कन्फर्म होणार की नाही हे तुम्हाला कळत नाही. प्रवाशांची हीच समस्या दूर करण्यासाठी रेल्वे एक पाऊल उचलणार आहे. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचा वेटलिस्ट चार्ट आता चार तासांऐवजी एक दिवसआधी तयार करण्याची योजना आहे. यामुळे रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता येईल अशा विश्वास व्यक्त केला जातोय. 6 जूनपासून बिकानेर रेल्वे विभागात हा प्रयोग सुरु करण्यात आलाय. यानंतर देशाच्या विविध भागात हा प्रयोग राबवला जाईल. विशेषतः दिल्ली ते उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये जिथं वर्षभर वेटिंग लिस्ट अधिक असते तिथं हा प्रयोग राबवला जाणार आहे.
यासोबतच बिहार, उत्तर प्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरातकडे जाणा-या रेल्वेच्या तिकीटासाठी प्रचंड चढाओढ असते. तसंच दिल्ली मुंबई मार्गावरील रेल्वे तिकीटासाठीही प्रवाशांना प्रचंड कसरत करावी लागते. अशा सर्व ठिकाणी 24 तास आधी वेटलिस्ट चार्ट तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. अशावेळी रेल्वेने जाण्याचा ओढा सर्वाधिक चाकरमान्यांचा असतो. पण रेल्वेची तिकीट उपलब्ध नसल्याने किंवा कन्फर्म होतील की नाही याबाबत चाकरमान्यांच्या मनात साशंकता असते. अशातच रेल्वे निघायच्या एक दिवस आधी तुमचं तिकीट कन्फर्म होणार की नाही? हे तुम्हाला कळू शकणार नाही. त्यामुळं जरी तिकीट कन्फर्म झाली नाही तर तुम्ही प्रवासासाठी दुसऱ्या पर्यायाचा मार्ग वापरू शकता. रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे. लवकरच संपूर्ण देशात ही प्रणाली राबवण्यात येणार आहे.