Maharashtra ATS Raid Bhiwandi : 2 जूनला महाराष्ट्रात ATS चे आजपर्यंतचे सर्वात मोठे सर्च ऑपरेशन झाले. दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने म्हणजेच महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील पडघा इथं छापा टाकला. 22 जणांच्या पथकानं कारवाई केली. 400 ते 500 पोलिसांच्या पथकाने संपूर्ण गाव ताब्यात घेतला. या छापेमारीबाबात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील 'या' छोट्याशा गावाला इस्लामिक स्टेट घोषित करण्यात आले. मुंबईपासून फक्त 72 KM अंतरावर असलेल्या छोट्याशा गावामुळे संपूर्ण भारत देश धोक्यात आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून फक्त 68 किमी अंतरावर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजपासून फक्त 72 किमी अंतरावर, महाराष्ट्र पोलिस मुख्यालयापासून फक्त 75 किमी अंतरावर आणि मुंबईतील पश्चिम नौदल कमांड कार्यालयापासून ७४ किमी अंतरावर असलेल्या एका गावाला इस्लामिक स्टेट घोषित करण्यात आले आहे. एटीएसने केलेल्या छाप्यादरम्यान हे उघड झाले आहे.
महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात छापा टाकला. 22 जणांच्या पथकानं कारवाई केलीय. दहशतवाद्यांसंदर्भात एटीएसनं छापे टाकलेत. एटीएसनं काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.. एटीएस पथकानं साकिब नाचनच्या घरावरही छापे टाकलेत. दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या सिमी या संघटनेचा पदाधिकारी असलेल्या साकिबला यापूर्वी 2 दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये 2002- 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर 2017 मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला, असा आरोप त्याच्यावर आहे. या कारवाईनंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
साकिब नाचन जिथे लपला होता तिथे महाराष्ट्र एटीएसने छापा टाकला. शोध मोहिमेत एटीएसने मोबाईल हँडसेट, तलवारी, चाकू आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देणारे आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त सापडली आहेत. साकिबच्या तपासात झालेले खुलासे गजवा-ए-हिंदच्या आंतरराष्ट्रीय कटाकडे निर्देश करतात. तपासात असे दिसून आले आहे की साकिबने ठाण्यातील त्याचे गाव पघडा अल शाम म्हणजेच इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केले होते.
अल शाम म्हणजे इस्लामिक राजवटीखालील क्षेत्र. अल शाममध्ये शरिया कायदा लागू केला जातो. आयसिसचा नेता बगदादी देखील अल शाम निर्माण करू इच्छित होता. 2011 च्या जनगणनेनुसार, पडघा येथे 83 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणूनच साकिबने येथे गजवा-ए-हिंदचा पहिला प्रयोग केला आणि भारतीय भूमीवरील एक गाव अल शाम म्हणून घोषित केले. हे साकिबचे चाचणी स्थळ होते. त्याला संपूर्ण भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करायची होती. यासाठी साकिब एका आंतरराष्ट्रीय कट्टरपंथी नेटवर्कशी जोडला गेला होता. साकिबला त्याच्या अल शाम येथे तिरंगा नाही तर दहशतवादी संघटना आयसिसचा झेंडा फडकवायचा होता. भारतीय संविधानाचा कायदा नाही तर शरिया कायदा लागू करण्याचा त्याचा कट होता.