Marathi News> कोकण
Advertisement

महाराष्ट्रातील या 2 जिल्ह्यात वर्षातून 4 महिने 50 हजारपेक्षा जास्त नेपाळी नागरिक फक्त 'या' कामासाठी येतात

भारतात अनेक ठिकाणी नेपाळी नागरिक आपल्याला काम करताना दिसतात. मात्र, महाराष्ट्रात असे दोन जिल्हे असे आहेत जिथे नेपाळी नागरिक फक्त 4 महिने काम करतात आणि पुन्हा आपल्या देशात परत जातात.    

महाराष्ट्रातील या 2 जिल्ह्यात वर्षातून 4 महिने 50 हजारपेक्षा जास्त नेपाळी नागरिक फक्त 'या' कामासाठी येतात

Nepali Worker In Maharashtra Konkan :  महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठं व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र मानले जाते. पर राज्यातून हजारो लोक नोकरी तसेच व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात येतात. अनेकदा या परप्रांतीयावरुन राजकारण देखील केले जाते. महाराष्ट्रात सातत्याने पर प्रांतीयांचे स्थलांतर सुरुच आहे. महाराष्ट्रात दोन जिल्हे असे आहेत जिथे पर प्रांतीय नाही तर 50 हजार पेक्षा जास्त नेपाळी नागरिक येतात. विशेष म्हणजे हे नेपाळी नागरिक ठराविक कामासाठी येथे येतात आणि फक्त तीन ते चार महिने वास्तव्य करतात. यानंतर मात्र, हे सर्व नेपाळी नागरिक पुन्हा आपल्या देशात परत जातात.

संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नेपाळी नागरिक वॉचमनचे काम करतात. मुंबईत तर सर्सास अनेक ठिकाणी आपल्याला नेपाळी वॉचमन पहायला मिळतात. भारतीय रुपयाचे नेपाळमध्ये मूल्य अधिक आहे. यामुळे अनेक नेपाळी रोजगारासाठी भारतात येतात. फक्त वॉचमन म्हणूनच नाही तर मिळेत ते काम हे नेपाळी नागरिक करतात. यामुळेच या नेपाळी नागरिकांना कोकणात चांगलीच डिमांड आहे. आंबा सिजनमध्ये 50 हजारपेक्षा नेपाळी नागरिक कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात येतात.    

आंबा हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. साधारण जानेवारी फेब्रुवारीपासून आंब्याला मोहोर येतो आणि कोकणात आंबा सिजनची लगबग सुरु होते. कोकणात हापुस आंब्याच्या बागांमध्ये हजारो नेपाळी काम करतात. कोकणातील गावं ओस पडली आहेत. सर्व तरुण मंडळी नोकरीसाठी मुंबईची वाट धरातात. यामुळे गावात शिल्लक राहिली आहेत ती फक्त वृद्ध माणसं.  कोकणातील आंबा व्यवसाय देशातील कोट्यावधीची उलाढल करणारा व्यवसाय आहे. कोकणात हजारो आंबा बागायतदार आहेत. एक एकाच्या बागेत हजारो आंब्याची कलमं आहेत. मात्र, आंबा बागेत काम करण्यासाठी माणूस मिळत नसल्याने कोकणी माणसाला नेपाळी माणसावर अंवलबून राहावे लागत आहे.

जानेवारी फेब्रुवारीपासून आंब्याला मोहोर यायला सुरुवात झाली की आंबा बागायतदारांसमोर सर्वात मोठं आव्हान असतं ते बागेची माकडं तसेच जनावरांपसून राखण करणं. यामुळे सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळी अंधार पडेपर्यंत बागेत थांबून राखण करण्याची गरज असते.  कोकणात राखणादारीसाठी माणूस मिळत नाही. यामुळे खास आंबा बागांची राखणदारी करण्याच्या कामासाठी नेपाळी नागरिक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात येतात. फेब्रुवारीपासून कोकणात कामासाठी येतात. जून महिन्यात आंबा सिजन संपेपर्यंत नेपाळी आंबा बागेत काम करतात. हे नेपाळी राखणदारीसह आंबा काढणी, आंबा भरणी अशी अनेक कामं करतात.  कोकणातील आंबा बागायतदार या नेपाळी नागरिकांना महिन्याला 10 ते 20 हजार रुपये पगार देतात. आंबा सिजनमध्ये कोकणात राहून हे नेपाळी  नागरिक 50 ते 80 हजार रुपयांची कमाई करतात. यांच्या राहण्याची व्यवस्था हे आंबा बागायतदारच करतात.  चार महिन्यात चांगली कमाई करुन हे नेपाली पुन्हा आपल्या देशात जातात.   
 

 

Read More