प्रत्येक पालकांसाठी त्याच मुलं हे जीव की प्राण असतं. मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि ते निरोगी राहावेत म्हणून आई वडील आपल्या दिवसरात्र एक करत असतात. मुलांची जरा तरी तब्येत खराब झाली की पालकांच्या जीव नकोसा होतो. मुलांचं संगोपन करणे, त्यांना निरोगी ठेवणे ही जबाबदारी पूर्णपणे आई वडिलांची असते. पण कधी कधी तुमची नकळत घडलेली चूक तुम्हाला मोठ्या महागात पडू शकते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पालकांच्या एका चुकीमुळे त्यांच्या 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या घटनेबद्दल सांगितलं आहे. ते या व्हिडीओमध्ये म्हणाले की, एका 9 वर्षांच्या मुलीला जुलाब झाले होते. ज्यामुळे ती काहीही खात-पीत नव्हती. जुलाब आणि त्यात ती काही खात नव्हती त्यामुळे तिला कमजोरी आली होती. तिच्या शरीरात पाण्याची कमतरता आली होती. अशात पालकांना काळजी वाटू लागली. तिच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाली होती. या भीतीमुळे, पालकांनी तिला रात्रभर वारंवार साखरेचे पाणी दिलं. जेणे करुन साखर पाण्याने तिची प्रकृती सुधारेल.
डॉक्टर पवन म्हणतात की, आईवडील रात्रभर मुलीला साखरेचे पाणी देत राहिले आणि सकाळपर्यंत मुलाची साखरेची पातळी 500 च्या वर पोहोचली. त्या मुलीची प्रकृती सुधारण्याऐवजी इतकी बिकट झाली की मुलगी कोमात गेली आणि तिची प्रकृती गंभीर झाली. जेव्हा तिला अतिसार होतो तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते. यावेळी साखरेचे पाणी दिल्यास साखरेचे प्रमाण अचानक वाढतं आणि त्यामुळे डायबेटिक केटोअॅसिडोसिस सारखा आजार होतो. यामुळे मेंदूला सूज येते आणि नंतर मूल कोमात जातं.
डॉ. मांडविया म्हणतात की, अतिसार झाल्यास, मग तो लहान मुलगा असो वा प्रौढ, सर्वांना फक्त WHO-मान्यताप्राप्त ORS द्यावं. तसंच, मुलाला कधीही घरी बनवलेले साखर मिसळलेले पाणी किंवा घरी बनवलेला रस चुकूनही देऊ नका.
डॉ. पवन पुढे म्हणतात की, जर मूल ओआरएस सोल्यूशन किंवा पाणी पीत नसेल, तर घरी बनवलेले लिंबू किंवा साखरेच्या पाण्याचे द्रावण देऊ नका, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)