नाशिकच्या नामको कॅन्सर हॉस्पिटलला लाचखोरीचं ग्रहण लागलं आहे. या रुग्णालयात उपचार घेणा-या एका महिलेवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झाली. मात्र तरीही तिच्या पतीकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली. या घटनेमुळे नामको कॅन्सर रुग्णालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राज्यातील अनेक चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय आहेत, ज्यामध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत किंवा कमी खर्चात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. मात्र जे चॅरिटेबल रुग्णालय गरजू नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेत, त्याच रुग्णालयांमध्ये गोरगरिब जनतेची लूट असल्याचं दिसत आहे. पुण्यातील मंगेशकर चॅरिटेबल रुग्णालयाच्या घटनेनंतर राज्य सरकारने सर्व चॅरिटेबल ट्रस्टवर कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र तरीही अजूनही काही चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये गोरगरिब रुग्णांची लूट सुरु आहे.
नाशिकच्या नामांकित नामको कॅन्सर रुग्णालयातही अशाचप्रकारे लूट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्नी कॅन्सरग्रस्त असल्याने तिच्या उपचारांसाठी पतीनं नाशिकच्या नामको रुग्णालयात महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र उपचारानंतर या दाम्पत्याकडे 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या रुग्णालयात काम करणा-या वैद्यकीय अधीक्षक आणि 2 महिला कर्मचा-यांनी हे पैसे मागितले, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला याची कल्पना होती की त्यांच्या आडून हा प्रकार सुरू होता असे प्रश्न उपस्थित होतायत.
लाचलुचपत विभाग या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय. गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही महिला कर्मचा-यांची चौकशी केली जात आहे. हे सर्व आरोप खोटे असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास असून यातले कोणतेच आरोप सिद्ध होणार नाहीत असंही रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.
- गोरगरिब रुग्णांच्या लुटीची रुग्णालय प्रशासनाला माहिती होती?
- कुणाच्या आशीर्वादाने ही लुटमार सुरू होती?
-या योजनेअंतर्गत उपचार केलेल्या सर्व रुग्णांकडून पैसे घेतले का?
- नेमकी कधीपासून गोरगरिब रुग्णांची पिळवणूक सुरू होती?
गोरगरिब जनतेला मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सरकार अशा योजना आणते आणि चॅरिटेबल रुग्णालयांना मान्यता देते. मात्र ज्या उद्देशाने या रुग्णालयांची सुरुवात करण्यात येते. त्याउलट या रुग्णालयांमध्ये कारभार सुरू असतो. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातही अशीच लुटमार सुरु होती. त्यामुळे अशा चॅरिटेबल रुग्णालयांवर कठोर कारवाईची गरज आहे.