Chhagan Bhujbal Exclusive: नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात (Maharashtra Politics) समावेश झाला. त्यानंतर त्यांनी 23 मे गुरुवारी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारला. भुजबळ हे निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या समावेश मंत्रिमंडळात होईल अशी अपेक्षा होती. पण त्यांना डच्चू देण्यात आला. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यासोबत झालेल्या गोष्टी आणि त्यांची कोंडी याबद्दल त्यांनी मोकळेपणे बोले. झी 24 तासच्या टू द पॉइंट या शोमध्ये संपादक कमलेश सुतार यांच्याशी भुजबळ यांनी पक्षानंच दिलेल्या वागणुकीबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला.
निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली होती असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये भुजबळांनी पक्षात होणाऱ्या कोंडीबद्दल खंत व्यक्त केलीये. आमदार झाल्यावर राज्यसभेची ऑफर का दिली होती असा सवालही त्यांनी विचारला. भुजबळ म्हणाले की, 'लोकसभेला मला उभं करण्यासाठी दिल्लीला नक्की झालं. होळीच्या दिवशी तिघांनी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, उभं राहिलाच पाहिजे, असं सांगितलं. एक महिन्यात चांगल वातावरण तयार झालं पण माझं नाव जाहीर केलं नाही. मग माझ्या लक्षात आलं हे माझं इव्हॅलूशन सुरू आहे. मी म्हटलं मी नाही लढत आता. काय करायचं करा. सगळ्यांची नावं जाहीर झाली.'
पुढे म्हणाले की,'मग राज्यसभा आली.आपण जरा दूर राहूयात असं ठरवलं. दुसरी आली मग नितीन पाटील त्यांना उभं केलं. का तर तुम्ही इथे पाहिजे कारण लोकसभेत वाताहात झालं होतं. त्यावेळी सरकार येईल की नाही अशी शंका होती. तुम्ही इथे पाहिजे तुम्ही लढले पाहिजे. मी हो म्हटलं तर दोन दिवस ते सराटीचे नेते आले ते बसले. ती लढत अटीतटीची झाली. निवडणूक झाल्यानंतर ते मला सांगतात भुजबळ साहेब आमचं मतं आहे तुम्ही राजीनामा द्यावा. म्हटलं काय राजीनामा द्यावा. पक्षाने सांगितलं की तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या. कारण तुम्ही राजीनामा द्या आम्ही तिथे नितीन पाटलांना राजीनामा द्यायला सांगतो. तुम्हाला राज्यसभेला जायचं होतं ना. इथे नाशिकमध्ये आम्ही समीर भुजबळ यांना उभं करतो. मी म्हटलं हे काही शक्य नाही.'
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अनेक पक्षांमधून ऑफर होत्या असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीत भुजबळांनी हा गौप्यस्फोट केलाय. तसंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन होणार नाही असं भुजबळांनी म्हटलंय. झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आपली भूमिका मांडली..