Manikrao Kokate On Farmers: नाशिक दौऱ्यावर असलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय. यानंतर राज्यभरातील शेतकरी, विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. काय म्हणाले कृषीमंत्री कोकाटे? त्यांच्यावर कशाप्रकारे टीका केली जातेय? सविस्तर जाणून घेऊया
नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी कृषीमत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि पैशाच्या वापराबाबत नाराजी व्यक्त केली. एका शेतकऱ्याने त्यांना कर्जमाफीबाबत थेट प्रश्न विचारला, 'अजित पवार म्हणाले की कर्जमाफी होणार नाही मग रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?' या प्रश्नावर कोकाटे यांनी उत्तर देताना स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आणि शेतकऱ्यांचा रोषही ओढावून घेतला.
'जे शेतकरी कर्ज वेळेवर फेडतात त्यांनी फेडावं पण अनेकजण पाच-दहा वर्ष फक्त कर्जमाफीची वाट बघतात. कर्ज घेतात आणि काही भरत नाहीत. आणि जेव्हा कर्जमाफी होते तेव्हा मिळालेल्या त्या पैशांचा उपयोग शेतीसाठी होतो का? एक रुपयाचीही गुंतवणूक शेतीत करता का? असा थेट सवाल त्यांनी शेतकऱ्याला केला.
सरकार शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विविध योजना देते, त्यामध्ये पाईपलाईन, सिंचन, शेततळे अशा योजना समाविष्ट आहेत. पण शेतकऱ्यांकडून या निधीचा उपयोग शेतीत करण्याऐवजी वैयक्तिक खर्चासाठी होतो, अशी टीका त्यांनी केली.तुम्ही पीक विमा मागता, पण त्या पैशांतून साखरपुडे करता, लग्न करता,' असे कोकाटे उपस्थित शेतकऱ्यांना संबोधत म्हणाले. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक सवयींवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना समाजमाध्यमातून व्यक्त केली जातेय.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झालेत.कोकाटे हे देखील शेतकरी कुटुंबातील असून अनुदानाच्या पैशातून आम्ही लग्न करतो की कर्ज घेऊन हे कोकाटे यांनी एकदा येऊन पहावं असं आव्हान शेतकऱ्यांनी कोकाटेंना केलंय. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं शेतक-यांबाबत हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाही.याआधीही कृषीमंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाही असं वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं होतं.आता पुन्हा एकदा कोकाटे बरळल्यानं शेतकऱ्यांमधून संतापाची भावना व्यक्त होतेय. दरम्यान कोटाकेंच्या या वक्तव्यांनंतर राजकीय प्रतिक्रीया उमटू लागल्यात. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करणारं असल्याची प्रतिक्रिया दिलीये.. तर सरकारला शेतकऱ्यांची देणंघेणं नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केलीये. तर कोकाटे हे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय.