प्रफुल्ल पवार (प्रतिनिधी) रायगड : पिढ्यानपिढ्या किल्ले रायगडावर राहणाऱ्या धनगर कुटुंबांना गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने तगादा लावला आहे. आता या वस्तीतील नागरिकांना गड सोडण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ही कुटुंब या ठिकाणी येणाऱ्या शिवप्रेमी, पर्यटकांना ताक, दही, चहा, नाश्ता पुरवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. गड सोडता आम्हाला घरं नाहीत. आम्ही जायचं कुठं आमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे असं म्हणणं त्या कुटुंबाचं आहे.
किल्ले रायगडावरील धनगर समाजाच्या वस्तीत बहुतांश कुटुंब रायगडावर येणा-या शिवप्रेमींना नास्ता, जेवण पुरवून आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र, याच वस्तीतील नागरिकांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. ही धनगर समाजाच्या वस्तीतील नागरिकांना गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागानं नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे मोठं संकट उभं ठाकलंय. पिढ्यानपिढ्या रायगडावर राहणा-या धनगर समाजाच्या वस्तीतील नागरिकांनी गड सोडल्यास आम्ही जायचं कुठं, असा सवाल उपस्थित करत गड खाली करण्यास नकार दिला आहे.
गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागानं दिलेल्या नोटीसांमुळे ही कुटंब भयभीत झाली आहेत. आता पावसाळा सुरु असताना जायचं कुठं असा प्रश्न या वस्तीतील नागरिकांसमोर आ वासून उभा ठाकलाय. इथल्या नागरिकांना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंसह छत्रपती संभाजीराजेंनी धीर दिला आहे.
झोपडीवजा असलेल्या रायगडावरील धनगर समाजाच्या वस्ती उठवण्यासाठी यापूर्वीदेखील नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र, स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमी संघटनांनी त्यांना विरोध केला होता. आता पुन्हा केंद्रीय पुरातत्व विभागानं नोटीसा बजावल्यानं इथल्या वस्तीतील नागरीक मोठ्या संकटात सापडलेत.