Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशी 7 जुलै रोजी आहे. तर, आषाढी वारी सुरू झाली आहे. संपूर्ण राज्यभरातून जवळपास 300 दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या असून लाखो वारकरी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने वारीत सहभागी झाले आहेत. माऊलींच्या पालख्यादेखील पंढरीसाठी रवाना झाल्या आहेत. वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. लाखो वारकरी मैलन मैल चालून विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचतात. वारीचा हा सोहळा अनुभवणे म्हणजे स्वर्गसुखच असते. हजारो वारकरी भजन, किर्तनात रंगलेले असतात तर सतत विठुनामाचा जागर सुरू असतो. तर, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असल्याचे तुम्ही पाहिले असेलच. पण हे तुळशी वृंदावन पंढरीला नेण्याचे कारण काय जाणून घेऊयात.
डोईवर तुळशी वृदांवन घेउन महिला वारीत सहभागी होतात. इतकंच नव्हे तर या तुळशी वृंदावनासहच नाचत, गात, ओव्या, अभंग म्हणत पालखीसोबत पुढे चालतात. काही महिला तर संपूर्ण वारी अनवाणी पायाने करतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? की महिला वारीत चालताना डोक्यावर तुळशी वृंदावन का घेतात. तर त्यामागे देखील या महिलांची श्रद्धा आहे. ही प्रथा परंपरेनुसार चालत आली असून अनेक वर्षांपासून तिचे पालन केले जातेय.
तुळस डोक्यावर घेऊन वारीत चालणे म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची ओढ दर्शवते, अशी श्रद्धा आहे. तुळस हे फक्त रोप नसून त्याचे अध्यात्मिक महत्त्वदेखील अधिक आहे. कृष्णाला तुळस प्रिय आहे. तुळशीला हरिप्रिया असंदेखील म्हटलं जातं. विठ्ठल म्हणजेच विष्णुचा अवतार असल्याचे म्हटलं जातं. तुळस ही पवित्रता, भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे. म्हणूनच वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन चालतात. कारण एकप्रकारे त्या विठ्ठलाप्रती आपली निष्ठा आणि प्रेम व्यक्त करतात. तुळशीप्रमाणेच आपला पवित्र भाव दाखवतात.
तुळस डोक्यावर घेऊन चालण्यामागे एक वैज्ञानिक कारणदेखील सांगितले जाते. ते म्हणजे तुळशीत अँटिबॅक्टेरिअल, अँटिव्हायरल गुण असतात. त्यामुळं हवेतील जंतु कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळं महिलांच्या आरोग्याचेदेखील रक्षण होते. तुळस हे आरोग्याचेही प्रतीक आहे. तुम्ही ऐकलं असेलच की तुळस ही ऑक्सीजन देते आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. त्यामुळं तुळशीला आरोग्यदायीदेखील म्हणतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)