Ashadhi Wari 2025 : विठ्ठलभेटीसाठी संतश्रेष्ठांच्या पालख्यांचं काही दिवसांनीच पंढरपूरमार्गे प्रस्थान होणार आहे. मोठ्या संख्येनं वारकरी या वैकुंठात दाखल होती आणि सर्वच्र हा वैष्णवांचा मेळा डोळे दिपवणार असंच काहीसं चित्र येत्या काळात पंढरपुरात पाहता येणार आहे. तत्पूर्वी इथवर पोहोचण्यासाठी विविध मार्गांनी प्रवास करु पाहणाऱ्या वारकरी मंडळींसाठी राज्य शासनानं अतिशय महत्त्वाची आखणी करत त्यांना खास भेटच दिली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य संरक्षण आणि हमी देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येणार असून त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
नुकत्याच झालेल्या पावसाच्या माऱ्यामुळं वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. तर, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावेत अशाही सूचना त्यांनी केल्या. इतकंच नव्हे, तर वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा टोल सवलत दिली जाणार असल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
आषाढी वारीनिमित्त करण्यात येणारं नियोजन, उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. याच बैठकीचा तपशील माध्यमांना सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
मागील वर्षाप्रमाणेच यंदासुद्धा वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जाईल. सोबतच वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेसह पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. शिवाय प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
वारीदरम्यान दुर्दैवानं झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, यादरम्यान पोलिसांशी समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल असंही शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.
आरोग्य सुविधांशिवाय वारकऱ्यांचं भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यातील याची काळजी घेण्यासोबतच यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याचा मानस बोलून दाखवत त्यांनी वारकऱ्यांकडूनही सहकार्याची अपेक्षा केली.