अनिरूद्ध दवाळे (प्रतिनिधी) अमरावती : विविध मागण्यांसाठी बच्चू कडू हे आक्रमक झाले आहेत. चौथ्या दिवशीही बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर बच्चू कडू ठाम आहेत. दरम्यान जरांगे पाटील आणि शरद पवारांचाही कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे.
शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांचे प्रश्न घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून देखील मोठा प्रतिसाद मिळतोय. मनोज जरांगे पाटलांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद दिलाय.
दरम्यान शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसंच शरद पवारांनी आंदोलनासंदर्भातली माहिती देखील बच्चू कडू यांच्याकडून घेतली. दरम्यान शरद पवारांचा देखील आंदोलनाला पाठिंबा असल्याचं बच्चू कडूंनी यावेळी सांगितलं आहे. एकीकडे अमरावतीत बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईत मंत्रालयाबाहेर बच्चू कडू समर्थकांनी आंदोलन केलं आहे. बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मंत्रालयाच्या गार्डन गेटवर झालेल्या आंदोलनात अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतल आहे. यावेळी सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत ताब्यात घेतलं.
बच्चू कडूंच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बच्चू कडू यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केला. दरम्यान त्यानंतर कडू यांनी बावनकुळेंच्या भाषेवर आक्षेप नोंदवला. मात्र, आपण बच्चू कडू यांच्यासोबत सन्मानानेच बोललो असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं.
सरकारनं शेतक-यांना दिलेलं आश्वासन पाळावं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी. दिव्यांग व विधवा महिलांना रु. 6000/- मानधन देण्यात यावं. शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावं. धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे.
बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून ते आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कडूंनी म्हटलं आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या मागण्या सरकार मान्य करणार का? तसंच सरकार आंदोलनावर कोणता तोडगा काढणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.