राज्यात शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही दोन गट पडले. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि महायुतीत सामील झाले. निवडणूक आयोगानेही पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना दिलं. त्यामुळे राज्यात आता अजित पवार आणि शरद पवारांची असे दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट पडले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच कोथरुडमध्ये लागलेल्या एका पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
पुण्यातील डेक्कन परिसरात एक भावनिक आणि राजकीय संकेत देणारा फ्लेक्स लावण्यात आला होता, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकत्र यावं, असा आशय व्यक्त करण्यात आला होता. या फ्लेक्सवर "अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात" असा संदेश झळकत होता. त्यासोबतच "सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा" असंदेखील लिहिण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, हा फ्लेक्स शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने लावल्याचं बोललं जात होतं.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आलेला हा फ्लेक्स या चर्चांना आणखी खतपाणी घालणारा ठरला. मात्र, हा फ्लेक्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने किंवा अन्य कारणाने काही तासातच हटवण्यात आला.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर, हा प्रकार केवळ एका कार्यकर्त्याची भावना आहे की अधिक काही संकेत देतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत मनोमिलनाचे वारे वाहत आहेत. राष्ट्रवादीतील या दोन गटांच्या विलीनीकरणाची बातमी थेट मोठ्या पवारांनीच फोडल्याने त्यांच्या पक्षातील पुरोगामी कार्यकर्त्यांमंध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. जितेंद्र आव्हाड, प्रशांत जगतापांसारखी मंडळी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर अनेक कार्यकर्ते यावर लवकर निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. विकास लवांडे यांनी पवार कुटुंबाने ही संभ्रमावस्था संपवावी असं थेट आवाहनच केले आहे.
दुसरीकडे अंकुश काकडेंसारखी मंडळी मात्र पक्षाची सद्यस्थिती नजरेसमोर ठेऊन अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही दिसत आहेत. यासाठी त्यांनी थेट सुप्रिया सुळेंनाच पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. त्यातच वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पवार काका-पुतणे एकाच मंचावर आले. यावेळी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्या भाषणादरम्यान दोघांत संवादही झाला. त्यामुळे एकत्रिकरणाच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे.
शरद पवार खरंतर पुरोगामी विचारांचे पाईक मानले जातात. किंबहुना त्यासाठीच ते अजित पवारांसोबत सत्तेत गेलेले नाहीत. मात्र, आता पक्षातलाच एक मोठा गट सत्तेसाठी अजित पवारांसोबत जाण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रकारे दबाव टाकू लागला आहे. त्यामुळे शरद पवारांनी याबाबतचा निर्णय थेट सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात ढकलून दिला आहे. आगामी पक्ष बैठकीत विचारधारा तग धरतेय की सत्ता जिंकतेय हेच पाहायला मिळत.