Ankita Kadale 10th Result: एक अल्पवयीन मुलगी जिला भविष्यात डॉक्टर बनायचं होतं पण गावगुंडांच्या त्रासाल कंटाळून आत्महत्येसारख कठोर पाऊल उचलते. आता तिचा दहावीचा निकाल समोर आलाय. पण आपला निकाल पाहायला ती आता हयात नाहीय. बारामतीतल्या अंकिताची कहाणी आपण जाणून घेतोय. जी ऐकून तुमचे डोळे पाणावतील.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील अंकिता कडाळेने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. पण या निष्पाप शाळकरी मुलीला गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवावं लागलं होतं. 8 एप्रिल 2025 रोजी अंकिताने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मयत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे.
एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते. मात्र 4 आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती. अंकितचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत. दोषींना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल अशी प्रतिक्रिया अंकिताच्या पालकांनी दिलीय.
वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षाच्या आजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आजीचे सर्वत्र कौतुक होतंय. अजीसोबत नातूदेखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालाय. उत्तीर्ण झालेल्या इंदूताई यांना 51 टक्के गुण मिळाले आहेत तर नातू धीरज याला 75 टक्के गुण मिळाले आहेत. एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले होते आणि समोर आलेल्या निकालानुसार ते पासही झालेयत. केवळ सातवी पर्यत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदूताई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आले नाही. पण वयाच्या 68व्या वर्षी इंदूताईना प्रथम संस्थेच्या मदतीने त्यांना पुन्हा शिकण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत संधीच सोनंदेखील केलं. जामनी गावात इंदूताई बचत गटाच्या कामात सतत पुढाकार घेताना दिसतात. इंदूताईनी माहेरी असताना सातवीपर्यत शिक्षण पूर्ण केलं होतं. पण त्यानंतर त्यांचं लग्न झालं. शिकण्याची इच्छा असतानाही पुढे शिकता आले नाही. पण प्रथम या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना दुसरी संधी देत दहावीची परीक्षा तयारी करून घेतली. त्यांना परीक्षेला बसविलं.त्यात इंदूताई यांनीदेखील वर्षभर दहावीचे धडे गिरवत परीक्षा दिली. इंदूताईसोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची दहावीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले. म्हातारीला या वयात परीक्षा द्यायची सुचली? असे म्हणत टीकाही व्हायला लागली. पण आता याच म्हातारीने परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड बंद केलय.