गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. गुन्हेगारी, धमक्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. सावकारी जाचाला कंटाळून एका व्यापा-यानं आत्महत्या केलीय. सावकार असो की गुंड बीडमध्ये सध्या दहशत पसरलीय.
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं केंद्र बनलेला बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. सावकारी जाचाला कंटाळून एका व्यापा-यानं आत्महत्या केलीय. संजय कांकरिया हे पाटोदातले व्यापारी होते. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतलं. कांकरियांनी कर्जाची सहा पट रक्कम फेडली मात्र सावकारांची नजर त्यांच्या जमिनीवर होती. आणखी पैसे द्या, असा तगादा सावकारांनी कांकरियांकडे लावला. इतक्यावर ते थांबले नाहीत. व्यापारी कांकरियांना सावकारांनी थेट धमकी द्यायला सुरुवात केली. पैसे दिले नाही तर चटके देऊन तुझ्यासह कुटुंबाला संपवू, अशी धमकी दिली. हा वाढता जाच आणि धमक्या सहन न झाल्यानं त्यातून मुक्त होण्यासाठी कांकरिया यांनी अखेर जीवन संपवलं.. मात्र त्याआधी त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना चिठ्ठी लिहिली. यात जाच करणा-या सावकारांची नावं लिहिली आहेत.
पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा साथीदार अमृत भोसले या दोघांकडून कांकरिया यांनी व्याजानं पैसे घेतले होते. या दोघांना कांकरियांनी सहा पट पैसे परत केले तरीही त्यांनी पैशांचा तगादा लावला. चटके देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. कांकरियांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सध्या दोघेही फरार आहेत. पोलिसांचं एक पथक त्यांचा माग काढतंय.
पाटोदा शहराला सावकारांचा पाश बसलाय. याचा कसून तपास केल्यास आणखी मोठे मासे गळाला लागू शकतात, असं सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी म्हटलंय. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं आव्हान पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासमोर आहे. यात त्यांना यश मिळतंय का यावरच बीडच्या जनतेचं भवितव्य अवलंबून असेल.