Beed Crime News: आपल्या मुला-मुलींचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. यासाठी अनेक पालक आयुष्यभर झटतात आणि पै अन् पै बाजूला काढून ठेवतात. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी एक असलेल्या आपल्या लाडक्या लेकाच्या किंवा लेकीच्या लग्नासाठी कसलीही कमतरता राहू नये यासाठी कष्टाने बाजूला ठेवलेला पैसा योग्य पद्धतीने खर्च करता यावा असं नियोजन पालक करतात. मात्र असं स्वप्न उराशी बाळगलेल्या बीडमधील एका वडिलांनी लेकीच्या लग्नासाठी बाजूला ठेवलेले पैसे तर मिळाले नाहीच त्यांना चक्क बँकेच्या गेटवरच शेवटचा श्वास घेत जगाचा निरोप घ्यावा लागला.
काळजी पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे बीडमधील गेवराईमध्ये! गेवराई तालुक्यातील खळेगावात राहणाऱ्या सुरेश आत्माराम जाधव यांनी लेकीच्या लग्नाचं स्वप्न उराशी बाळगतच जीव सोडला. सुरेश हे येथील छत्रपती मल्टीस्टेट बँकेतील ठेवीदार होते. त्यांनी या बँकेच्या गेटलाच गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश यांचं छत्रपती मल्टीस्टेट बँकेबरोबरच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत खातं होतं. या दोन्ही बँकांमधील पैसे त्यांना लेकीच्या लग्नासाठी काढायचे होते. मात्र त्यांना तसं करता आलं नाही.
समोर आलेल्या माहितीप्रमाणे, सुरेश जाधव यांनी लाडक्या लेकीचं लग्न जवळ येत असल्याने छत्रपती मल्टीस्टेट बँकेतील आपल्या 11 लाख रुपयांच्या ठेवी काढण्याची प्रक्रिया समजून घेत त्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी त्यांनी अतिरिक्त पैसे हाताशी असावेत म्हणून ज्ञानराखा मल्टीस्टेट बँकेत ठेवलेल्या 5 लाख रुपयांच्या ठेवी काढण्यासाठीही प्रक्रिया सुरु केली. मुलीच्या लग्नासाठी सुरेश यांना 16 लाख रुपयांची गरज असल्याने त्यांनी मागील अनेक वर्षांपासून साठवलेले पेसै बँकेतून काढण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्यास सुरुवात केली.
बुधवारी रात्री उशिरा बँकेत गेले अन्...
मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही सुरेश जावध यांना बँकेतील रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे सुरेश जाधव यांनी स्वत:ला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. बुधवारी रात्री उशिरा सुरेश जाधव कुटुंबासहीत बँकेत गेले होते. त्यानंतर पुढील काही वेळातच सुरेश जाधव हे बँकेच्या मुख्य गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकारामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत. सुरेश जाधव यांना बँकांनी ज्या पद्धतीची वागणूक दिली त्यावरुन मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सुरेश जाधव यांच्या मृत्यूस जबाबदार कोण? असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.