Think Twice before Buying House : तुम्ही राज्यात कुठेही मालमत्ता घेणार असाल सर्च रिपोर्ट काढल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि त्यातही केवळ 30 वर्षांचे रेकॉर्ड नव्हे तर किमान 75 वर्षांचा सर्च रिपोर्ट काढणं आवश्यक झालंय. कारण नाशिकमध्ये पंधराशे मालमत्ताधारकांची गुंतवणूक धोक्यात आली आहे. बघूया कसा झालाय हा मालमत्तांचा घोटाळा. नाशिकच्या शरणपूर गावठाणातील सव्वाशे इमारती धोक्यात? कोट्यवधी रुपयांची दुकाने आणि इमारतींसारख्या मालमत्ता धोक्यात आले आहेत. मनपा नगररचना विभागाने दिलेल्या परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.
नाशिक शहरात कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या शरणपूर गावठाणात मोठ मोठ्या व्यावसायिक इमारतीत कोट्यवधी रुपये किंमत असलेली दुकानं आहेत. इथं दुकानाचे गाळे असावेत यासाठी अनेकांनी कर्ज काढून, मालमत्ता विकून गाळे घेतलं. पण या मालमत्ताधारकांची गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. नाशिक डायोसेशन काउन्सिलच्या सदस्यांनी मार्च 2001 रोजी दस्त नोंदणी करत विकासकांच्या नावानं बेकायदेशीर विक्रीचा दस्त नोंदविला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे खोटी माहिती सादर करून भूखंड बळकाविण्या बरोबरच विक्रीचे आदेश प्राप्त करून घेतले. धर्मादाय संस्थेला भूखंडाच्या विक्रीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते.मात्र, कागदपत्रांचा घोळ करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सातबारा उतारावरं वर्ग 1 मध्ये जमिनीचं रूपांतर करुन सव्वाशे इमारतींना परवानगी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशनच्या मूळ मालकीच्या जागा बळकाविणाऱ्या 37 विकासकांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या भूखंडावर जवळपास 125 इमारतींना नाशिक मनपानं बांधकामाबरोबरच पूर्णत्वाचा दाखला दिल्याने, मनपाचा नगररचना विभागही संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता न्यायालयीन लढाईमध्ये वर्षानुवर्ष मालमत्ताधारक अडकल्यानं मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय.
आयुष्यभर जमवलेली पुंजी, फायदेशीर ठिकाणी गुंतवून आयुष्यभराची सोय करावी अशी सामान्यांची आशा असते, मात्र अशा घोटाळ्यांमुळे गुंतवणूक करण्यापूर्वी जमीनींचे वर्षानुवर्षांचे रेकॉर्ड तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे आता कुठेही गुंतवणूक करताना दोनवेळा नाही तर हजार वेळा विचार करा. कागद पत्र तपासा आणि त्यानंतर घर घेण्याचा निर्णय घ्या.