Bharat Gogawale On Narayan Rane : शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आणि आता भाजपा.... नारायण राणेंच्या या राजकीय प्रवासात धक्कादायक ट्विस्ट येणार होता. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आणि पुन्हा शिवसेना असा हा प्रवास झाला असता. भाजपमध्ये जाण्याअगोदर नारायण राणे शिवसेनेत येणार होते असा धक्कादायक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत केला आहे. 100 टक्के नारायण राणे शिवसेनेत येणार होते. पण, शिवसेनेत ने येता नारायण राणे यांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय का घेतला याचे कारण सांगताना मंत्री भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
हाडाचा शिवसैनिक आणि फायरब्रँड नेता अशी नारायण राणे यांची ओळख. मात्र, उद्धव ठाकरेंशी मतभेद झाले आणि 2005 मध्ये नारायण राणेंनी 10 आमदारांसह शिवसेना पक्ष सोडला. राणेंनी काँग्रेसपक्षात प्रवेश केला. दिल्लीतील नेत्यांमुळे नारायण राणेंना काँग्रेस पक्षात कधीच आपली पकड मजबूत करता आली नाही. याद दरम्यान निलेश राणेंचा दोन वेळा लोकसभा निवडणुकीतला पराभव, आणि खुद्द राणेंचा विधानसभा निवडणुकीतला आणि पोटनिवडणुकीत पराभव झाला. यामुळे 2017 मध्ये राणेंनी स्वाभिमान नावाचा वेगळा पक्ष काढला. पक्षाची ताकद वाढवता आली नाही. यामुळे राणेंनी 2019 मध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.
भाजपमध्ये न जाता नारायण राणे शिवसेनेत प्रवेश करणार होते. असा दावा भरत गोगवले यांनी केला आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. यावेळेस राणेंना शिवसेनेत घ्या असं अनेकदा उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी अनेकदा नारायण राणेंना शिवसेनेत घेण्याची संधी गमावली. राणेंना शिवसेनेत घेतले असते तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र आता वेगळे असते असंही भरत गोगावले म्हणाले.
शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉईँट या कार्यक्रमात मोठे दावे केले आहेत. बाळासाहेब असताना ते स्वत:चे ऐकायचे. मात्र, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात. राजकीय कारभारात रश्मी ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केला आहे. कुणाला निवडणुकीचं तिकट द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही, याचाही निर्णय रश्मी ठाकरे घ्यायच्या असा मोठा दावा गोगावलेंनी टू द पॉईंट या कार्यक्रमात केला आहे.