Vasant More on Bharat Gogawale : झी 24 तासवरील टू द पाइंट या विशेष कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असा धक्कादायक आरोप केला. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावलेंवर पलटवार केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भरत गोगावले यांनी घरी ओम् भट स्वह म्हणत केली अघोरी पूजा केली, गंभीर आरोप मोरे यांनी केला आहे.
बगलामुखी इथून साधू महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केली असा आरोप मोरे यांनी केला आहे. 'महाराष्ट्रात जे अघोरी प्रकार घडतात, बगलामुखी हा अघोरी प्रकार आहे. निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होती, 1 महिना आधी ही पूजा त्यांच्या घरात घातल्या गेली होती. आता अशा पूजा जर होणार असतील तर आम्ही याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत तक्रार करू', असंही मोरे म्हणाले.
18 ऑक्टोबर 2024 रोजी गोगावले यांनी उज्जैन मधील बागलामुखी देवीच्या मंदिरात 11 महाराजांसोबत पूजा केली. त्यानंतर त्यांना आपल्या घरी बोलावून पूजा घातली होती. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला?” असा सवालही मोरे यांनी केला आहे. या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले आणि त्या पूजांचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध असून त्यांनी तो मीडियाला दिला आहे.
दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वसंत मोरे यांनी भरत शेठ गोगावले यांच्यावर घरातच बगलामुखी देवीची अघोरी पूजा घातल्याचा आरोप केलाय. पण अंनिसचे मिलिंद देशमुख यांनी माञ ही अघोरी पूजा नसून होम हवन किंवा फारतर कर्मकांड असल्याचं म्हटलंय.
दरम्यान वसंत मोरेंच्या व्हिडीओ बॉम्बचा भरत गोगावलेंनी नकार दिलेला नाही. वसंत मोरेंना राजकारणात काही मिळवायचं असेल तर त्यांना पुजेला नेतो अशी ऑफरही त्यांनी दिलीय.
बाळासाहेब असताना ते स्वत:चे ऐकायचे मात्र, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात. राजकीय कारभारात रश्मी ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केलाय. कुणाला निवडणुकीचं तिकट द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही, याचाही निर्णय रश्मी ठाकरे घ्यायच्या असा मोठा दावा गोगावलेंनी टू द पॉईंट या कार्यक्रमात केलाय.
उद्धव ठाकरेंनी आम्हाला ज्याप्रकारे वागणूक दिली ती न पटण्यासारख होतं. बाळासाहेब ठाकरे तोंडावर बोलायचे पण त्यांच्या मनात काय नसायचं. बाळासाहेब ठाकरे मॉसाहेबांचं ऐकायचे नाही. पण उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंचं ऐकतात, असे गोगावले म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव निश्चित झाले होते. पण जवळचे नातेवाईक आणि रश्मी ठाकरेंचं ऐकून त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं. अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळाल्याचा दावा गोगावलेंनी केला.