Bhaskar Jadhav on Shivsena Is Becaming Congress : शिवसेनेची काँग्रेस झाली असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत केलं होतं. त्यांनी 14 जानेवारी 2025 मध्ये चिपळूनमध्ये हे वक्तव्य केलं होतं त्यावरच हा प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी त्यांनी केलेल्या शिवसेनेची काँग्रेस झाली हे वक्तव्य करण्याचं कारण सांगितलं.
भास्कर जाधव त्यांच्या या वक्तव्याविषयी बोलताना म्हणाले, 'ही गोष्ट खरी आहे की शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे विधान मी केलं. पण हे विधान अर्धवट दाखवण्यात आलं. पूर्वीची शिवसेनेची कार्यप्रणाली काय होती? त्याचं स्ट्रकचर काय होतं? आणि आताचं शिवसेनेचं स्ट्रकरच बनत चाललंय हा फरक सांगत असताना मी हे विधान केलं. ही गोष्ट खरी आहे.'
पुढे शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे नेमकं काय? असा सवाल करताच भास्कर जाधव यांनी शिवसेनेचं स्ट्रकचर सांगत म्हणाले, 'पूर्वी शिवसेनेचं स्ट्रकचर होतं. शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे 13 नेते, त्यानंतर जिल्हा प्रमुख, त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख अशा पद्धतीची शिवसेनेची कार्यप्रणाली होती. आज आपण जर पाहिलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर तालुका प्रमुखाच्या बरोबरीनं तालुका समन्वय, एक तालुका संघटक, एक तालुका सचिव, एक तालुका कोण आणखीन. एका पदात्या भोवती आपण किती पद निर्माण करणार आहोत, जी कॉंग्रेसची पद्धत होती. कॉंग्रेसची पद्धत अशीच आहे. कोणी रुसला-रागवला की हा सरचिटणीस, तो उप-सरचिटणीस, तो उपाध्यक्ष. शिवसेनेचं तसं नव्हतं. शिवसेनेचा एक प्रमुख हा जिल्हा परिषदेच्या गटा प्रमुखाप्रमाणे असायचा. एक उपविभाग प्रमुख पंचायतसमिती गणाप्रमाणे असायचा. जेणे करून त्याचं कार्यक्षेत्र हे ठरलेलं असतं. काहीही झालं तरी ते त्यासाठी उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपल्या कार्यक्षेत्रात रिझल्ट आणणं त्याच्यावर बंधन कारक असतं. आता एकाच कार्यक्षेत्रात 10 पदाधिकारी नेमले तर कोणाची जबाबदारी कोणावर द्यायची. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये ज्या प्रमाणे फक्त खूश करण्यासाठी पद दिलं जातं होतं, तसं शिवसेनेत दिलं जाऊ नये हा माझा आग्रह त्या भांडणात होता आणि आजही आहे.'
शिवसेनेची कॉंग्रेस होणं चांगलं की वाईट? यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की 'प्रत्येक पक्षाची विचारधारणा ही वेगळी आहे. प्रत्येक पक्षाची कार्यप्रणाली ही वेगळी आहे. कॉंग्रेसची वेगळी आहे शिवसेनेची वेगळी आहे. आघाडी, युती हा विषय सोडून द्या, पण शिवसेनेची कार्यप्रणाली ही शिवसेनेप्रमाणेच राहिले पाहिजे. हे माझं मत आहे.'