Raigad Waghya Dog Memorial : हिंदवी स्वराज्याची राजधानी अशी ओळख असणाऱ्या किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरु असणारा वाद आता एका नव्या वळणावर आला आहे. जिथं छत्रपतींच्या घराण्यामागोमागच होळकरांच्या वंशजांनीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली.
होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी गुरुवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना समाधीवरून सुरू असणाऱ्या वादावर आपली भूमिका मांली. यावेळी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा हे प्रकरण आपल्यापर्यंत आलं आणि आजच्या घडीला हा विषय महत्त्वाचा नसला तरीही सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून आपण ही बाजू मांडत असल्याचं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
'वाघ्या कुत्र्यच्या समाधीचं हे प्रकरण आता दोन्ही गटांसाठी हा भावनेचा आणि अस्मितेच प्रश्न झालं आहे. शिवाजी महाराजांच्या वेळी वाघ्या कुत्र्याचं अस्तिवं होतं की नव्हतं याविषयी मी बोलणार नाही. कारण हा इतिहासातील त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. समकालीन पुरावे काय सांगतात, ती कायदपत्र काय सांगतात यावर त्या श्वानाचं अस्तिवं ठरेल. मात्र, सध्या जो वाद होतोय होऊ नये, स्मारकाकडे पाहणाऱ्याच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत', असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री, राज्य शासन आणि पुराततत्वं विभागाला विनंती करत त्यांनी योग्य आणि अयोग्य बाजूच्या वादात न पडता शासनानं यासाठी समिती नेमून त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात असा सल्ला दिला. यामध्ये राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून इतिहास अभ्यासकांना सोबत घेऊन संभाजीराजे यांच्यासह आपणही तिथं हजर राहू असं सांगताना सामोपचारानं तोडगा कसा निघेल यावर समितीनं सर्व बाजू समजून घेत निर्णय घ्यावा आणि सबंध महाराष्ट्रानं त्या भूमिकेसोहबत राहावं, अशी भूमिका स्पष्ट केलीय.
रायगडावरील समाधीत होळकरांचा सहभाग नेमका कधीपासून होता यावरही भूषणसिंहराजे होळकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. 'रायगडावरील शिवस्मारकासाठी होळकरांनी देणगी दिली इथून यामध्ये त्यांचा सहभाग सुरू होतो. वाघ्या कुत्र्याचं प्रकरण शिवकालीन आहे. ज्यावेळी शिवसमाधी उभी राहायची होती तेव्हा निधीची कमतरता असताना या स्मारक उभारणीसाठीच्या कामात सहभागी सणारी मंडळी इंदूरला गेली आणि तिथून होळकरांचा इथं संबंध येतो. होळकरांचा संबंध येतो म्हणून त्या स्मारकाशी आमच्या समाजाच्या भावना जोडल्या आहेत. ज्यामुळं कोणत्याही समाजाच्या भावना जोडलेल्या असताना त्याचा अनादर करून त्याविरोधात वक्तव्य केलं जाणार असेल तर खपवून घेतलं जाणार नाही', असं त्यांनी कटाक्षानं सांगितलं.
आपल्याला कोणाच्याही राजकीय भूमिकेमध्ये पडायचं नाही पण या मुद्दयारवर सर्व बाजूंनी चर्चा व्हायला हवी असा आग्रही सूर त्यांनी आळवला.
एका माणसानं सांगितलं होळकर हे इंग्रजांना घाबरत होते असं वक्तव्य करणाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना भूषणसिंह होळकर यांनी भारतात इंग्रजांना अखेरपर्यंत होळकरांनी लढा दिलाय या वक्तव्यावर जोर दिला.
यावेळी त्यांनी यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांच्यासह होळकर घराण्यातील महिलांचीही नावं घेत होळकरांविषयी बोलणाऱ्याचा इतिहासाचा अभ्यास किती? अशा प्रश्नार्थक सूरात टोला लगावला. होळकर घराण्याची बदनामी थांबवा असा इशारा देत त्यांनी यावेळी होळकर घराण्यानं कायमच शिवराय आणि छत्रपती घराण्याचा आदर ठेवला आहे या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.
टिळक, महात्मा फुले, तुकोजीरावांनी शिवस्मारकासाठी पुढाकार घेतला कारण तेव्हाचा महाराष्ट्र जातीपातीच्या पलिकडे होता असं सांगताना जातीपाती मध्ये आणून महाराष्ट्राची सामाजिक वीण बिघडवू नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वाघ्या कुत्र्याच्या समाधीसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता शासनानं घ्यावी असंही ते स्पष्टपणे म्हणाले.