BJP Minister Indirect Dig At Pawar Family: सहकार क्षेत्राबद्दल बोलताना भाजपाचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी नाव न घेत पवार कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी 'कारखानदारी हे कुटुंब चालवण्याचे साधन म्हणून अलीकडे काहींनी बघितलं, त्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम झालंय,' असा टोला लगावला आहे. गोरे यांच्या टीकेचा रोख पवार कुटुंबावर असून त्यांनी कुणाचे नाव न घेता ही टीका केल्याचे बोललं जात आहे.
सहकार वाढला पाहिजे. सहकारने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. शेतकरी संपन्न केलाय, हे सगळं खरं असलं तरी सहकारमध्ये सुरु असलेली बेबंदशाही थांबवण्याची जबाबदारी सहकारमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील तुमची आहे, असं जयकुमार गोरेंनी एका जाहीर सभेत म्हटलं आहे. "डीसीसी बँक, राज्य बँकेचे उदाहरणं तुम्ही पाहा. एक प्रशासक बसला होता तर डीसीसी बँक व्यवस्थित चालयाला लागली, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राज्य बँक जी हजारो कोटी तोट्यात होती, पण प्रशासक आला आणि ही राज्य बँक हजारो कोटीच्या नफ्यात आहे. याचं कधी तरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे," असा सल्लाही गोरे यांनी दिला. "सहकरामध्ये आपण पाहतो अनेकांचे कारखाने उभे राहिले. लोकांचे बँकाचे पैसे लागले. अनेक कारखाने सुंदर चालतात, पण कारखानदारी हे कुटुंब चालवण्याचे साधन म्हणून अलीकडे काहींनी बघितलं, त्यामुळे सहकार बदनाम झालाय," अशी बोचरी टीका गोरे यांनी केली.
"सहकारात बाहेरच्या माणसाला सहज सामावून घेतलं जातं नाही, माझ्यासारख्या माणसाला अनेक जण म्हणतात बाकी काहीही कर पण कारखाना काढू नको. ज्यांचे कारखाने आहेत त्यांचे एकचे दोन, दोनचे चार झाले, पण आम्हाला कारखाना काढू नका म्हणतात. पण सहकारबद्दल मला मनापासून आदर आहे. कारण याने शेतकऱ्यांना अनेकांना ताकद देण्याचा कामं केलं. पण काही लोकांमुळे ही चळवळ बदनाम झाली आहे. या चळवळकडे लोक शंकेच्या नजरेने बघायला लागलेत. आता लोकांच्या मनातून ही शंका काढून टाकण्याची जबाबदारी बाबासाहेब या खात्याचा मंत्री म्हणून तुमच्यावर आली आहे," असंही गोरे म्हणाले.
"माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती इमाने इतबारे पार पाडणारा मी माणूस आहे. जयकुमार गोरे हा शब्दाचा पक्का आहे, मी शब्द सहजासहजी देतं नाही आणि दिला तर कोणीहीमध्ये आलं तर ते सोडत नाही. माझ्याकडे कारखाना नाही, बँक नाही, माझा इतिहास नाही, भूगोल नाही. माझा इतिहास मीच लिहितोय. आई-वडिलांनी जन्म दिला आणि त्यापुढे इतिहास आपणच लिहितोय. फार चिंता करत नाही, आपणच लिहू आपणच पुसू. माझ्या आयुष्यात प्रचंड संघर्ष राहिलाय, इथं पोहोचण्यासाठी असंख्य अडचणी आल्या. मी जरं एखाद्या संस्थानिकचा, खासदार आमदाराचा मुलगा असतो तर हा संघर्ष वाट्याला आला नसता. पण मी एका छोट्या शेतकऱ्याचा मुलगा आणि संघर्ष कोणासोबत तर थेट मोठ्यासोबत. पण या संघर्षाच्या छतीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे चाललाय, संस्थानिक साम्राज्य असताना 4 वेळा आमदार झालो," असं गोरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल भाष्य करताना म्हटलंय.
"अभिमन्यूला चक्रव्युव्हत जायचं माहिती होतं पण परत येता आलं नाही. पण मला माझ्या गुरूने सगळे चक्रव्युव्ह पार करायचं सगळे मार्ग सांगितले आहेत. सोलापूरकरांनी मला प्रचंड प्रेम दिलं, मला आनंद आहे की विठुरायांच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, ज्या वारीमध्ये दर्शन घेताना पालखीपर्यंत पोहोचता यायचं नाही, पण याचं वारीचं नियोजन करण्याची जबाबदारी परमेश्वराने मला दिली," असंही गोरे म्हणाले.
या टीकेवरुन बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत चव्हाण यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला आहे. "सोलापूरमध्ये काल झालेल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शरद पवार व त्यांच्या कुटुंबावर टीका करत आपली "लायकी" दाखवली, अशी टीका पुणे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी केली. "ज्यांची स्वतःची कोणतीही पात्रता नाही, अशा लोकांना मंत्री केल्यावर अशा प्रकारच्या टीका अपेक्षितच असतात," गोरे व पाटील यांचे पश्चिम महाराष्ट्र तसेच साताऱ्यात शून्य काम असूनही केवळ पवारांवर टीका करण्यासाठी मंत्रीपद दिल्याचा आरोप त्यांनी केला.