Raj Thackeray Uday Samant Meeting: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका प्रमुख नेत्याने त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यामध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. सदर भेटीनंतर या नेत्याने प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदवली असली तरी यापूर्वी झालेली एक चूक टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकी कोणती चूक टाळण्यासाठी आपला महत्त्वाचा शिलेदार राज ठाकरेंच्या घरी पाठवलेला हे जाणून घेऊयात...
आज सकाळी साडेआठच्या सुमारास शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तसेच राज्यातील मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या मुंबईतील दादमधील 'शिवतिर्थ' या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. भेटीनंतर बाहेर आल्यावर, राज ठाकरेंची भेट ही अराजकीय होती असं मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. "राजकारणाच्या पलिकडेही आमचे संबंध आहेत. आजहीच भेट ही अराजकीय होती. कुठलीही चर्चा झाली नाही. मी चहा पिण्यासाठी राज ठाकरेंकडे गेलो होतो. मुंबई महानगरपालिकेसंदर्भात चर्चा झाली असती तर तसं सांगितलं असतं. राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंच्या भेटीला जाणार आहे. याचा अर्थ भेटीचा तपशील द्यायला जातोय असा घेऊ नये," असंही उदय सामंतांनी म्हटलं आहे. मात्र या भेटीकडे विधानसभेच्या वेळेस या दोन्ही पक्षांनी केलेली चूक टाळण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत योग्य चर्चा झाली नसल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभेमध्ये घोळ दिसून आला होता. दादर विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा सरवणकर यांना ऐन वेळी टिकीट दिले. यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष दिसून आला होता आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. युतीबाबत आणि जागा वाटपाबाबत योग्य चर्चा झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला. या वादात दादर-वरळी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार जिंकला. आता पुन्हा महापालिका निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्यात आहेत. त्यामुळे यावेळी जागा वाटपाबाबत कोणतीही चुकीची चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही राजकीय पक्ष आग्रही आहेत.
दोन्ही पक्षांमधील युतीच्या चर्चेला मागच्या वेळेप्रमाणे उशीर होऊ नये यासाठीची खबरदारी दोन्ही राजकीय पक्ष घेत आहेत. त्यामुळेच विधानसभेला केलेली चूक पुन्हा नको म्हणत बुके न स्वीकारता आधी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे.