Buldhana Mysterious Disease: बुलढाण्यामध्ये केस आणि नखं गळून पडण्याच्या आजारावरील रहस्यावर पडदा पडून रुग्ण बरे होत असतानाच आता जिल्ह्यातील नव्या रहस्यमय आजाराने डोकं वर काढलं आहे. मेहकर तालुक्यात असलेल्या शेलगाव येथे हातांना भेगा पडण्याच्या आजाराने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागाकडे यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने गावात धाव घेतली आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह मतदारसंघातील हा प्रकार असल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोग्य पथकामध्ये डॉ. प्रशांत तांगडे आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट यांचा समावेश आहे. जवळपास 20 रुग्णांची तपासणी या पथकाने केली आहे. यापैकी बहुसंख्य रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे, अनेकांना हा आजार 12 महिने ते पाच वर्षांपासून असून ते बुलढाणा आणि अकोला येथील तज्ञांकडून उपचार घेत आहेत.
डॉक्टरांच्या मते, हा आजार संसर्गजन्य नसून पाण्याचा याच्याशी संबंध नाही. विविध हानिकारक पदार्थांच्या संपर्कातून होणाऱ्या स्वयंप्रतिकार (ऑटोइम्युन) क्रियेमुळे हा आजार उद्भवू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेतली असून, या आजाराला घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्री जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "हा संसर्गजन्य रोग नाही आणि पाण्यातूनही तो पसरत नाही, याचीही तपासणी करण्यात आली आहे." त्यामुळे नागरिकांनी या प्रकाराला अजिबात घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. जर कोणाला हाताला खाज येत असेल किंवा इन्फेक्शन दिसत असेल, तर डोणगाव येथे उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही प्रतापराव जाधव यांनी दिली.
नक्की वाचा >> ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाने अख्खं कुटुंब संपवलं, काय आहे गेमिंग डिसॉर्डर? तुम्हीही त्यात अडकलाय का?
इसबगोल आजाराचा कालावधी: अनेक रुग्णांना हा आजार गेल्या 12 महिने ते 5 वर्षांपासून आहे.
सध्याचे उपचार: मागील एक ते दोन वर्षांपासून हे रुग्ण बुलढाणा आणि अकोला येथील त्वचारोग तज्ञांकडून उपचार घेत आहेत.
डॉक्टरांनी इसबगोल आजारासंदर्भात स्पष्टीकरण देताना काय माहिती दिली आहे ते पाहूयात...
> संसर्गजन्य आहे की नाही? - हा आजार संसर्गजन्य नाही.
> पाण्याशी संबंध आहे की नाही? - या आजाराचा पाण्याशी काहीही संबंध नाही. याचचा अर्थ असा की याचा प्रादुर्भाव पाण्यातून होत नाही.
> आजर होण्याची कारणे: विविध प्रतिजन (ऍन्टिजेन) किंवा हानिकारक पदार्थांच्या संपर्कातून उद्भवणाऱ्या स्वयंप्रतिकार (ऑटोइम्युन) पद्धतीमुळे हा आजार होऊ शकतो.
> आरोग्य विभागाने सर्व रुग्णांना योग्य ती काळजी घेण्यास सांगितले आहे.