Devendra Fadnavis On Ultimatum To Pakistani Citizens: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलत काही ठोस निर्णय घेतले असून याच निर्णयांमध्ये पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांचा व्हिसा तातडीने रद्द करुन त्यांना मायदेशी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी देण्यात आलेली मुदत आज संपत असतानाच महाराष्ट्रात राहणारे अनेक पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांमध्ये समोर आल्या. असं असतानाच आज राज्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी आज पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठवण्यासंदर्भातील अल्टीमेट संपत असल्याबद्दल भाष्य करताना महत्त्वाची माहिती दिली आहे.
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्यासंदर्भात देण्यात आलेली परवानगी भारताने तातडीने रद्द केली आहे. या निर्णयामुळे भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्ताना नागिरकांचे प्रवासी व्हिसा रद्द झाले आहेत. तसेच एसव्हीईएस व्हिसाच्या माध्यमातून भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ भारत सोडावा असे आदेश भारत सरकारने दिले आहेत. त्यासाठी त्यांना 48 तासांची मुदत देण्यात आलेली जी आज सायंकाळी संपणार आहे. याच पार्शभूमीवर महाराष्ट्रातील काही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावरुनच फडणवीसांनी अल्टीमेट संपण्यापूर्वी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांनी फडणवीसांना पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या अल्टीमेटबद्दल विचारलं. यावर उत्तर देताना फडणवीसांनी, "मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर उलट्या सुलट्या बातम्या करू नका. महाराष्ट्रातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही," असं उत्तर दिलं. तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी, "आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार," अशीही माहिती दिली.
22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केलं. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत सतत बैठकांचं सत्र सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीचीची बैठक घेतली. दोन तास चालेल्या या बैठकीमध्ये पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.