CM Devendra Fadnavis Warning: गुरुवारी रात्री उशीरा अचानक राज्यातील मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट करण्यात आल्याची घोषणा झाली. आपल्या वादग्रस्त विधानांबरोबरच थेट विधानसभेत मोबाईलवर पत्ते खेळताना आढळून आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची त्यांच्या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. कोकाटेंचं डिमोशन झालं असून त्यांच्याकडे क्रीडा खातं सोपवण्याचा निर्णय मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. कोकाटेंचं खातं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या कोकाटेंसाठी हा एक मोठा दणका मानला जात आहे. मात्र या खंदेपालटानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांना प्रसारमाध्यमांसमोरच सज्जड दम दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना फडणवीस यांना मंत्रिमंडळात खातेबदल करण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. हा खातेबदल कसा झाला याबद्दल फडणवीसांनी माहिती दिली. मंत्रिमंडळ खांदेपालटासंदर्भातील घडामोडी सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटेंचं खातं का बदललं हे अगदी कोकाटेंचं नाव घेऊन सांगितलं.
"जी घटना घडली त्यासंदर्भात मोठा रोष होता. त्यासंदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोकाटे यांचं खातं बदललं आहे. त्यांना दुसरं खातं देण्यात आला आहे. कृषी खातं मामा भरणे यांना देण्यात आलं आहे. आता तरी कुठला दुसरा बदल होईल अशी कोणतीही चर्चा नाही," असं फडणवीस यांनी सांगितलं.
एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना थेट निर्देश देण्यात आल्याची माहितीही दिली आहे. "आता या प्रकारे कोणीही बेशिस्त वर्तणूक केली तर त्यांना सर्वांना सांगितलं आहे की आम्ही हे खपवून घेणार नाही. कारवाई केली जाईल. सर्वांसाठी संकेत आहे," असं फडणवीस म्हणाले. तसेच, "जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत. मात्र त्यावेळेस आपण काय बोलतो, कसं वागतो, आपला व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता पाहत असते. त्यामुळे त्यावर अंकुश राहिलाच पाहिजे," असा सज्जड इशाराच फडणवीसांना दिला आहे.
दरम्यान, कोकाटेंच्या जागी कृषीमंत्रीपद मिळालेल्या भारणेंनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याचा उल्लेख आवर्जून केलाय. ""एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन," असं भरणेंनी पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलंय.