चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे : (Maharashtra Political News) महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच ज्येष्ठ नेते (Sharad Pawar) शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचच लक्ष वेधलं. पवारांच्या या वक्तव्यानं ते राजकारणात पुन्हा एकदा नवा प्रवाह जोडण्याचे संकेत देत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. ज्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी एकञ येण्यासंबंधीचं पवारांचं विधान का केलं हे मला माहित नाही पण यातून त्यांच्या सहकाऱ्यांची सत्ते साठीची हतबलता दिसते, असं निरिक्षण नोंदवलं आहे.
समजा पवार तिकडे गेलेच तर त्याचा मविआवर फारसा परिणाम होणार नाही, विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस सक्षमपणे निभावेल, असंही चव्हाण म्हणालेत. पण पवारांचं आजवरचं राजकारण हे जातीयवाद पक्षांविरोधात राहिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे सगळंच बदलून जाईल असंही चव्हाण मत त्यांनी झी 24 ताससह झालेल्या exclusive संवादादरम्यान मांडलं.
‘कोणाच्या नेतृत्त्वाखाली मविआ चालते असं म्हणणं योग्य नाही. मुळात मविआ आणि इंडिया आघाडीचं भविष्य दिल्लीतले नेते ठरवतील. स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणुकीच्या या माहोलात शरद पवारांचं वक्तव्य लोकांना संभ्रमात टाकणारं आहे. मुळात कोणासोबत जायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण तरीही पक्षाची एक भूमिका अशी असते. “कदापि आम्ही जातीयवादी पक्षाशी तडजोड करणार नाही” ही एक भूमिका. आणि “मग जर लोकांचं मत पडलं तर आमची काही हरकत नाही....” ही दुसरी भूमिका.
पवार साहेबांचं राजकारण पाहिलं तर फुले-शाहू-आंबेडकर, विचार, लोकशाहीत दृढविश्वास अशा त्तत्त्वांवर त्यांनी राजकारण केलं आहे. मोदी सरकारचं काय चाललं आहे हे आपण पाहतोय. त्यांच्याशी तडजोड करण्याकरता किंवा त्यांच्या सत्तेचा वाटा मिळवण्याकरता त्यांच्याशी हातमिळवणी करणं हा, किंवा तसा निर्णय घेतला तर सत्तेत सामील व्हायला हरकत नाही... असं म्हणणं हा एक मोठा बदल त्यांच्या विचारात दिसत आहे’.
एका मुलाखतीदरम्यानच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही असं पवार म्हणाले होते, ज्यावर चव्हाणांनी आपली भूमिकाही मांडली.
‘तरुण पिढीला सत्तेशिवाय राहता येणार नाही. त्यामुळे ती पिढी आग्रह करत असेल तर.... मुळात त्यांच्या पक्षात अंतर्गत काय चाललं आहे हे मी बोलणं योग्य नाही आणि मी ते करणारही नाही. पण “कदापि तडजोड करणार नाही” ही भूमिका आता राहिलेली नाही हे स्पष्ट होत आहे. पवार अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे विश्वासार्हतेवर मी बोलणार नाही. पण आतापर्यंतच्या राजकारणात त्यांनी कायम जातीयवादी विचारांविरोधात भूमिता घेतल्या आहेत. काही ठिकाणी तडजोडी झाल्याही असतील. 2014 मध्ये राज्यात स्थिरता आणण्यासाठी आम्ही पाठींबा देऊ असंही झालं होतं’. असा संदर्भ देत चव्हाणांनी नाण्याची दुसरी बाजूही समोर आणली.
राजकीय पार्श्वभूमीवर पवारांची भूमिका कायमच लोकशाहीवादी, समतावादी, पुरोगामी, जातीयवादविरोधी राहिली आहे. ती भूमिका बदलली आहे का? भूमिका बदलणार नाही असं ते म्हणालेले कुठेही दिसत नाहीत या मुद्द्याकडे चव्हाणांनी लक्षस वेधलं. त्यामुळं पक्षाने कुठे जावं हे मला मान्य आहे, असं ते म्हणाले असतील तर हे दुर्दैवी आहे असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. आता संकेत स्पष्ट आहेत कि निम्मी माणसं अजित पवार गटात सामील होण्यासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे हे स्पष्ट आहे असं म्हणत मुद्दा मविआचा असेल तर काँग्रेस पक्ष भाजपविरोधी भूमिका घेऊन काम करणारा आहे आणि जे येतील ते येतील नाही येतील तर आम्ही एकटे जाऊ असं ठाम मत त्यांनी मांडलं.
मुलाखतीदरम्यान एकंदर स्थिती पाहता, जर तरच्या गोष्टी मी करणार नाही. कोणी कुठं जावं, काय करावं हा ज्यांचात्यंचा प्रश्न आहे. अंतिम फैसला होईल तेव्हा पाहू अशा भूमिकेवर लक्ष वेधत ‘(पवारांच्या) अनुयायांनी निर्णय घेतलाच असेल तर पवार साहेब तरी काय करणार? एकंदरित हतबलतेचं चित्र दिसत आहे’, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात चढ-उतार येतात असं म्हणत त्यांनी काही राजकीय समीकरणं मांडली. महाराष्ट्राच्या राजकारणासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याचे परिणाम दिसून येईल. बाकी कोणी सोडून गेलं तर आम्ही एकटेच राहू मात्र इतक्यात शिवसेना जाईल असं वाटत नाही. त्यामुळं आम्ही एकत्र राहू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘देशाच्या राजकारणात एका पक्षाच्या हातात सूत्र द्यायची का? आणि लोकशाहीला लोकशाही म्हणायचं का? हे देशाचे नागरिक ठरवतील. लोकशाही टीकवायची असेल तर परस्परविरोधी दोन विचार हवेत, त्या विचारांची लढाई झाली पाहिजे’, असं म्हणताना भारतात मात्र सध्या बहुपक्षीय लोकशाही नकोय. हुकूमशाही हवीये, एकपक्षीय लोकशाही हवीये ही वस्तूस्थिती त्यांनी समोर आणत विचारधारा कमी झाली आहे अशा शब्दांत नाराजीचा सूर आळवला. ‘राजकीय पक्षाअंतर्गतच लोकशाही कमी आहे. कुटुंबाशी निगडीत असणारे पक्ष निर्माण होत आहेत. ते विचारावर आधारित नाहीत, ते फक्त सत्ता आपल्याकडे कशी ठेवायची यावर आधारित आहेत. त्यामुळं भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे’, असं निरीक्षणही त्यांनी अधोरेखित केलं.