Sanjay Raut: शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येतंय. मुंबईतील 40 पेक्षा जास्त माजीनगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान वर्धापन दिनाच्या मंचावरुन नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय. काय म्हणाले राऊत? जाणून घेऊया.
महाराष्ट्रात मनोरंजनाचे कार्यक्रम होतायत. आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतली आहे. रोज काहीतरी वेगळा कार्यक्रम असतो. आज थरारक सिनेमा झाला. कोणीतरी एक मंत्री अघोरी बाबासह बसलाय. उघडाबंब. त्या अघोरी बाबाच्या हातात कवटी आहे. त्याच्या खुर्ची खाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं. असा हॉरर सिनेमा पाहिला. या सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक यांचा डोममध्ये कार्यक्रम होतोय. आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही. आपण विचार देऊया. बाळासाहेबांनी एकूण 60 वर्षाच्या शिवसेनेच्या माध्यमातून राज्याला विचार देण्याचा कार्यक्रम दिल्याचे राऊत म्हणाले.
वाघ कधी शरण जात नाही. पण आताचे वाघ अमित शाह, नरेंद्र मोदींना शरण गेलेयत. स्वत:ला वाघ समजणारे लोकं अमित शहा, मोदींचं गवत खातायत. शिवसेना या देशाच्या राजकारणातला सर्वात जुना अनुभवी पक्ष आहे. शिवसेना महाराष्ट्रात गर्जना करत होती, लढाया लढत होती, तेव्हा हे पक्ष पाळण्यात होते, असेही राऊत म्हणाले.
मागील 4 वर्षात अनेक संकट आली. पण शिवसैनिकाच्या संघर्षामुळे आज शिवसेना आहे. हल्ल्यानंतरही शिवसेना झुकली नसल्याचे ते म्हणाले.
तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाकलात. सर्व केलं. पण आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसणारे 4 दहशतवादी गेले कुठे? याचा शोध केंद्रीय गृहमंत्र्यांना घेता आला नाही. राजकारण भाजपने सुरु केलं. ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली मतं मागितली जात असल्याचे राऊत म्हणाले.