Ajit Pawar on Marathi: राज्यात सध्या मराठीच्या अस्मितेवरुन संघर्ष सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका हिंदी पत्रकाराला सुनावलं आहे. राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्याचा जीआर रद्द झाला असला, तरी मराठी भाषेचा मुद्दा अद्यापही ज्वलंत आहे. अनेक अमराठी भाषिकांनी आव्हान दिल्याने वाद पेटताना दिसत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा घेत मनसैनिकांना कोणी विरोध केल्यास धडा शिकवण्याचं आवाहन केलं आहे. यादरम्यान आता अजित पवारांनी एका हिंदी पत्रकाराला सुनावत मराठी बाणा दाखवून दिला.
अजित पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते प्रश्नांची उत्तरं देत असताना एका हिंदी पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर अजति पवारांनी आधी मराठी आणि नंतर हिंदी असं सांगत उत्तर देण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी पत्रकाराला खडसावत म्हटलं की, "ही काय पद्धत आहे तुमची, पहिलं मराठी चालतं. हा शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मराठी झाल्यावर मग हिंदी".
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील हॉटेलांवर लावलेल्या गुजरात पाट्यासंदर्भात मनसे आक्रमक झाली आहे. पालघर मनसे पदाधिकाऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हालोली येथील हॉटेलच्या गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. पालघरमध्ये लावलेल्या पाट्या मनसेने काढून टाकल्या आहे.
मुंबई अहमदाबाद महमार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाडपर्यंत बहुंताश हॉटेलांच्या पाट्या गुजराती भाषेत असल्यामुळं महमार्गावरुन पालघर जिल्ह्यात प्रवेश करताना या पाट्या दिसत होत्या. या पाट्यांविरोधात पहिल्यांदा झी 24 तासने आवाज उठवला होता. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत या हॉटेलच्या पाट्यांची तोडफोड केली आहे.
मनसे आक्रमक झाल्यानंतर काही हॉटेलच्या मालकांनी गुजराती पाट्या उतवण्यात आल्या आहेत. घोडबंदर ते अच्छाडपर्यंतच्या हॉटेलमध्ये इंग्रजीत पाट्या आहेत त्याचबरोबर इंग्रजीत पाट्या आहेत. मात्र कुठेही मराठीत पाटी नसल्याने आपण नेमके महाराष्ट्रात आहोत की गुजरातमध्ये असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र आता या पाट्याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून काही ठिकाणी पाट्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर काही हॉटेलला थेट इशारा देण्यात आला आहे.
"कानावरती मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. छोटा प्रसंग होता तो... तिथे पाणी प्यायला त्या हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्या माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढत आहात. तेव्हा जी बसायची होती ती बसली. लगेच त्या व्यापारांनी बंद पुकारला. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही असले बंद करता. तुम्हाला काय वाटलं व्यापारी मराठी नाहीत. शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रात राहत आहात शांतपणे राहा. आमचं काही तुमच्याशी भांडण नाही. पण इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार," असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीचे करणार म्हणजे करणार. राज्य सरकारला आत्महत्या करायचीच असेल तर त्यांनी बेशक करावी.त्यादिवशी मोर्चाच्या भीतीने त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. तुम्ही म्हणताय की हिंदी आणणार म्हणजे आणणार. मी आता तुम्हाला सांगतो की पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी आणण्याचा प्रयत्न तरी करून दाखवा. दुकानच नाही तर शाळा सुद्धा बंद करणार," असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.