Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महायुतीमधील धुसफूस पुन्हा समोर! भाषण नाकारल्याने दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा

चैत्यभूमीवरच्या अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे.   

महायुतीमधील धुसफूस पुन्हा समोर! भाषण नाकारल्याने दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा

आम्ही सगळे खूश असं म्हणणा-या महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. आणि आता तर दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. चैत्यभूमीवरच्या अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे. 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमीवर सरकारकडून अभिवादन सभा घेण्यात आली. साग्रसंगीत हा कार्यक्रम पार पडत असतानाच महायुतीत पुन्हा नाराजीनाट्य सुरू झालं. राजभवनाकडून देण्यात आलेल्या शेड्युलनुसार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर राज्यपाल यांचं भाषण नियोजित होतं. पण कार्यक्रमला बराचसा वेळ झाल्याने फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपाल या दोघांनीच भाषणं केली. महत्वाच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणापासून वंचित ठेवण्यात आल्याने शिंदे आणि पवार नाराज असल्याची चर्चा रंगली.

तर मला याबद्दल काही वाटत नाही आणि भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नाही, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. भाषणावरून कुणीही नाराज नाही, सगळं ठरवून होतं. जाणीवपूर्वक काहीच नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. 

निधीवाटप, पालकमंत्रीपद यावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून नाराजीचे वारे वाहत आहेत. रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही. आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणापासून लांब ठेवलं. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या ही गोष्ट जिव्हारी लागल्याचं दिसलं. त्यामुळे दोन्ही उप सध्या तापल्याचं दिसत आहे. आता मुख्यमंत्री फडवणीस नाराजी कशी दूर करतायेत, हे पाहावं लागेल.

Read More