Dhananjay Munde Resignation: मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचं मूळ कारण असलेल्या आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडेंच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी आवादा कंपनीच्या अधिका-यांसोबत धनंजय मुंडेंची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय. या बैठकीत 2 कोटी रुपयांच्य़ा खंडणीबाबत चर्चा झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असेल तर त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळं खंडणी प्रकरणातही धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आवादा कंपनीकडून खंडणी वसुली केली जात होती. त्या खंडणी प्रकरणातून आवादाच्या साईटवरील सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीला झालेल्या विरोधातून संतोष देशमुखांची हत्या झाली. या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग आढळल्यास त्यांचं राजकीय भवितव्यही अंधकारमय होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानं या प्रकरणात त्यांचाही संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्याततततच येत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंना थेट आरोपी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.