Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट होणार बंद, ग्राहक चिंतेत

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 10 तारखेपासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जाणार असाल तर खिशात पैसे घेऊन जा अन्यथा तुम्हाला पेट्रोल भरता येणार नाही. 

महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट होणार बंद, ग्राहक चिंतेत

खरंतर देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. लहान मोठ्या खरेदी करताना डिजिटल व्यवहार आपण करतो. अगदी 10 रुपयापासून हजारांचे व्यवहार आजकाल डिजिटल करताना लोक आढळतात. अशातच वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुमच्या खिशात पैसे नसेल तर तुम्हाला गाडीत पेट्रोल, डिझल भरता येणार नाही. कारण विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने पेट्रोल पंपवर डिजिटल पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 10 मे पासून हा निर्णय लागू होणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय. सद्यस्थितीत देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे.

सायबर पोलीस, बँकांच्या निर्णयाविरोधात पंपचालक आक्रमक

पेट्रोल पंपवर दररोज हजारो डिजिटल व्यवहार होतात. ग्राहक कोणत्या खात्यातून पैसे पाठवत आहेत, त्याचा इतिहास काय आहे, याची माहिती घेणे पंप चालकांच्या आवाक्याबाहेर आहे. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आलीत. ही रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे, असं सांगण्यात आलंय. 

विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने घेतलेल्या डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णयाचा ग्राहकांवर मोठा परिणाम होणार. या निर्णयाबद्दल ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इकडे सरकार डिजिटल इंडियासाठी आग्रही असताना सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

Read More