Bharat Gogawale: 2022 मध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना घेऊन सूरतच्या दिशेने निघाले. त्यानंतर ते सूरतमधून गुवाहाटी-गोवामार्गे मुंबईत आले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड होती. तसंच, शिवसेनेच्या इतिहासातीलही सर्वात मोठे बंड होते. पण या बंडाची खलबतं साधारण एक वर्षांपासून सुरू होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला आहे.
भरत गोगावले यांनी म्हटलं आहे की, साधारण एक वर्षापासून बंडाचे प्लानिंग सुरू होते. त्याला कारण होते उद्धवसाहेबांनी आम्हाला वागणूक देण्याची पद्धत सुरू केली ती आम्हाला पटली नाही. आम्ही बाळासाहेबांचे समर्थक हे निश्चित होते. परंतु बाळासाहेब बोलायचे ते मनात कधी ठेवलं नाही. बाळासाहेबांनी कधीच माँसाहेबांचे ऐकलं नाही. स्वतः निर्णय घेऊन सांगायचे. उद्धवसाहेब त्यांच्या पत्नीचे ऐकतात.'
' ज्यावेळाला उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. तेव्हा एखाद्या मावळ्याला आदित्य ठाकरेंचं मंत्रीपद दिलं असतं तर त्यांची उंची अधिक वाढली असती. तसं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना श्रीकांत शिंदेंना मंत्रीपद देता आलं असतं. पण दिलं का साहेबांनी? त्यांनी प्रतापराव जाधवांना संधी दिली. फरक किती आणि मोठेपणा किती हे दिसतं ना त्याच्यामध्ये. नाहीतर एवढं रामायण महाभारत घडलं नसतं, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे आमदार सूरतला कसे पोहोचले हे देखील भरत गोगावले यांनी सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही विधानभवनातून आधी सूरतला गेलो. आधी नंदनवनला आम्ही गेलो तिथे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हेदेखील माझ्यासोबत होते. आम्ही तिथेच गाड्या बदलल्या आणि टोलनाक्यावरुन थेट सूरतला पोहोचला. त्यानंतर बाकीचे एक एक आले. पहिल्या फेरीत आम्ही 27- 28 जण होतो. त्यामध्ये अग्रगण्य आम्ही होतो. 1 वर्षांपासून प्लानिंग होते. साहेबांनी आम्हाला सगळं सांगितले आम्ही प्रामाणिक होतो. साहेबांनी सांगितल्यावर मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर एकास एक सगळे सांगत गेलो. कारण काही अशा घडामोडी व्हायल्या लागल्या त्यामुळं शिंदे साहेबांना हा निर्णय घ्यावा लागला, असाही दावा त्यांनी केला आहे.
आम्ही सूरतवरून गुवाहाटीला गेलो तेव्हा त्यांची मिटिंग झाली. त्या मिटिंगमघध्ये आता जे आलेले आमदार होते ते होते. तेव्हा संजय राऊत एकदा बोलले होते. सगळे येतील पण भरतशेठ येणार नाहीत. म्हणून मधल्या काळात आमचा कोणशीही संपर्क झाला नाही. त्यांनी मिलिंद नार्वेकरांना सूरतला पाठवले होता. पण त्यांनी एक चूक केली, एकीकडे बोलणी करायला पाठवलं आणि तिथे एकनाथ शिंदेंचे नेतेपद काढून घेतलं. तुम्ही चर्चा तर पूर्ण करा. आज काढणार होता ते उद्या काढा. एकीकडे माणूस पाठवताय चर्चेला आणि एककीडे पद काढून जखमेवर मीठ चोळताय, असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.