Unseasonal Rain : महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बीडमध्ये शेतकऱ्याचा कांदा पावसात भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे पाहुयात सविस्तर... 'मी आता पुरती थकलेय नाही झेपत हो आता. नक्की आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? हा चिखल बघा. तुम्हाला सांगायला मला शब्दही सुचत नाहीय. नोकरी
करणाऱ्याला महिन्याला सॅलरी मिळते. व्यवसाय करणाऱ्याला त्याचे दिवसाचे पैसे मिळतात. अचानक ते मिळणारच नाहीत असं झालं तर तुमची जी घालमेल होईल ना. तशीच कदाचित त्याहून जास्त घालमेल माझी झाली आहे. आम्ही बीडचे आष्टीच्या शिंदेवाडीतले तीन एकरात कांद्या लावला. चांगलं पीक यावं म्हणून पाच सहा महिने राब राब राबले. उन्हातान्हात शेतात कसले, पीक आलं, कांदा काढला, शेतात वाळवला आता बाजारात नेऊन विकायचा तेवढा शिल्लक होता. पण दृष्ट पावसानं घात केला. थोडा थोडका नाही हो 300 गोणी कांदा अवकाळीनं नासवला. सांगा ना आमची काय चूक.'
त्यानंतर याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'मरेस्तोर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची मेहनत अशीच मातीमोल होते. आम्ही करायचं तरी काय? शेवटी शेतकरी. उद्या नुकसान भरपाई मागितली तरी तुम्ही लोक कुजबुज करणार. आधीच काळजी घ्याची होती. कुठेतरी साठवायचा होता. अहो, शेतात न राबणाऱ्या लोकांना बोलणं सोपं आहे. शेत उघड्यावर आहे. कडाक्याच्या उन्हात अचानक अवकाळी पाऊस आला. जमेल तेवढा झाकला लगेच नेणार तरी कसं आणि साठवायचा तरी कुठे? शेतकरीच नाही तर त्याच्या कुटुंबाला हे भोग भोगावे लागतात. आता मायबाप सरकारलाच विनंती आहे, पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या. माझी चिमुकली पण मदतीला आली आहे. जून तोंडावर आलाय शाळा सुरू होणार फी कशी भरायची असा प्रश्न पडलाय. तीही बिचारी आमच्या बरोबर शेतात कांदे उचलते.'
हेही वाचा : पोटच्या बाळाला कुशीतही घेऊ शकत नाही अशी अवस्था, लोकप्रिय अभिनेत्रीला जडलाय दुर्मिळ आजार!
दुसरी शेतकरी महिला तिची व्यथा सांगत म्हणाली, 'माझी पण तीच व्यथा हो. सोनाली ताईंचा कांदा होता माझी हळद होती इतकाच फरक. हिंगोलीत सेनगावाच्या नागा सिंदगीमध्ये माझ्या शेतात मी हळद लावली. अपेक्षेप्रमाणे उत्पादन आलं. हळद वाळत घातली पण नशीबच खराब. वादळी वाऱ्यासह पावसानं झोडलं. आता शेतात वाळलेल्या हळदीचा पिवळा चिखल झाला आहे. हातातलं पीक गेलं आहे. आर्थिक नुकसान झालं. तुम्हीच सांगा आता पुढची वाट काय. बी बियाणांचे भाव आणि खतांचे भाव वाढलेत. त्यासाठी साठवलेला पैसा खर्च केला. पिकं आलं की काढणीला मजुर लागतात, त्यांच्या मजुरीचा खर्चही केला. हळद वाळली की विकायची हा विचार सुरू असताना अवकाळीचा मारा झाला आणि पिकांचा चिखल.'