Maharashtra Assembly Budget Session 2025 : अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. नव्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून अजित पवार उद्या अकरावा अर्थसंकल्प सादर करतील. तब्बल अकरावेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे ते महाराष्ट्राचे पहिलेच अर्थमंत्री ठरणार आहेत. राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी ते अर्थसंकल्पात काय तरतुदी करणार आहेत, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार विक्रमाच्या वाटेवर
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. यांच्यानंतर अजित पवार दुसरे सर्वाधिक म्हणजेच 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, अजित पवार यांनी उद्याचा अर्थसंकल्प धरून 11 वेळा, त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांना मिळाला. त्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. तर सुशीलकुमार शिंदे यांनी 9 वेळा अर्थसंककल्प सादर केला.
अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सर्वसमावेशक, क्रांतीकारी अर्थसंकल्प होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्वाचा वाटा होता. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असून अजित पवार त्या अपेक्षांवर खरे उतरतील, हा विश्वासही जनतेच्या मनात आहे.