कृष्णात पाटील झी 24 तास मुंबई : महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री या ना त्या कारणावरुन नाराज होतच असतात. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीस कारण ठरलंय खासगी सचिवांची नियुक्ती.... सीएमओकडून खासगी सचिवांच्या नियुक्तीला ग्रीन सिग्नल मिळाला नसल्यानं शिवसेनेचे चार मंत्री नाराज झालेत. खासगी पीए नेमण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंना साकडं घातलंय.
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या तक्रारी काही संपत नाही. कधी निधी वळवल्याची तक्रार तर कधी राज्यमंत्री म्हणून मिळत नसलेले अधिकार... अशा वेगवेगळ्या तक्रारी शिवसेनेकडून सुरुच असतात. आता त्यात आणखी एका तक्रारीची भर पडलीय. शिवसेनेच्या चार मंत्र्यांना अजूनही खासगी पीए मिळाला नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं करण्यात आलीय.
उदय सामंत -उद्योगमंत्री
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठामंत्री
संजय राठोड - मृद व जलसंधारणमंत्री
शंभुराज देसाई - पर्यटनमंत्री
या चार मंत्र्यांना खासगी पीए मिळालेला नाही. यापूर्वी काही मंत्र्यांच्या खासगी पीएंनी अनेक उचापती केल्या होत्या. त्यामुळं मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय आता खासगी पीए नेमण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार एकनाथ शिंदे फडणवीसांच्या कानावर घालणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.
शिवसेनेचे नेते मंत्र्यांची तक्रार असल्याचं सांगत असले तरी खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत मात्र आपली खासगी पीएविना कोणतीही अडचण होत नसल्याचं सांगितलं आहे. महायुती सरकारमध्ये शिवसेनेचा नाराजीनामा सुरुच आहे. प्रत्येकवेळी फक्त मुद्दा वेगळा असतो. यावेळी मंत्र्यांच्या खासगी पीएंच्या नियुक्तीचा विषय आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या चार मंत्र्यांची नाराजी दूर करतात का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.