श्री. अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तशा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सस्नेह नमस्कार,
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.
परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.
आपला
देवेंद्र फडणवीस
सत्ता येते आणि जाते.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत लिहिलेल्या या पत्रामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप अजित पवार यांनी यासंदर्भातील कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र आता ते फडणवीस यांना काय आणि कसं उत्तर देतात यासंदर्भातील चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजामध्ये सुरु आहे.