Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबईला वेगळं रेल्वे बोर्ड द्या - मनसेची मागणी

Mumbai Railyway Accident : मुंबई लोकलमध्ये झालेल्या अपघातानंतर मनसेची सरकारकडे मागणी...

मुंबईला वेगळं रेल्वे बोर्ड द्या - मनसेची मागणी

Mumbai Railyway Accident : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत चार निष्पापांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून राग व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांनी सरकार, रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली.मनसेनेही गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध व्यक्त केलाय. मुंबईला वेगळा रेल्वे बोर्ड द्या यासह अनेक महत्वाच्या मागण्या मनसेनं केल्यात.

सतत धावत असलेल्या मुंबईला काल लोकल अपघातानं काही काळ थांबवलं. सोबतच मुंबई लोकल, गर्दी, ट्रेनची संख्या, नियोजन याबद्दल गंभीरतेने विचार करायला भागही पाडलं. मुंब्र्यात झालेल्या लोकल अपघातानंतर मुंबईकरही आता संतापलेत. आता मुंबईला वेगळा रेल्वे बोर्ड देण्याची मागणी होते. मनसेने आक्रमक भूमिका घेत गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत धडक मोर्चा काढला. दरदिवशी रेल्वे अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू होतो. यावर लवकरात लवकर उपाय काढण्यासाठी आणि योजना राबविण्यासाठी मनसेनं रेल्वे प्रशासनाला ताकिद दिली, सोबतच वेगळा रेल्वे बोर्ड द्या ही आग्रही मागणी केली. यावेळी अनेक सामान्यही मोर्चात सहभागी झाले. विविध योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यापेक्षा सामान्य मुंबईकरांकडे लक्ष द्या अशी मागणी केली. यावेळी महिला प्रवाशांनी रोजच्या लोकल यातना मांडत प्रशानसावर परखड टीका केलीये

मनसेच्या काय आहेत प्रमुख मागण्या?

लोकलमधील प्रवाशांची संख्या आणि त्या प्रमाणात आसन क्षमता आहे का? याचा तक्ता सादर करायला हवा. दिवा-CSMT अशी लोकल सेवा का चालू केली जात नाही? याची माहिती द्या. रेल्वे अपघातातील नुकसान भरपाईची रक्कम वाढवून 25 लाख रुपये करा. अपघातांच्या केसेस अनेक वर्षे प्रलंबित ठेवण्याचं प्रयोजन काय? एका डब्यामध्ये किती प्रवाशांनी प्रवास करावा, याची नियमावली सादर करा. मुंबई लोकल सेवेतून मिळणाऱ्या मासिक उत्पन्नाची माहिती द्या, अशा मागण्या मनसेनं केल्या आहेत. 

मोर्चातून मनसेच्या शिष्टमंडळानं रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसह इतर मागण्यां सादर करत अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनसेनं रेल्वे प्रशासनाला 8 दिवसांचं अल्टिमेटम दिलंय

'मागण्या पूर्ण न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन' अविनाश जाधव, मनसे नेते

लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या अपघातांमुळे लोकल ही डेथलाईन बनत चाललीये. वाढत्या लोकसंख्येसाठी लोकलची पुरेशी संख्या, प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणं, सोयी सुविधा पुरवणं याकडे आता रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यायलाच हवं. सोबतच मुंबईला वेगळं रेल्वे बोर्ड मिळायला हवं ही मनसेची मागणीही रास्त आहे. ज्या मुंबईतून केंद्राला, राज्य सरकरला कोट्यवधी महसूल मिळतो, त्या शहराचा प्रधान्याने विचार व्हायलाच हवा. केवळ मृत्यूवर शोक करून चालणार नाही. आता लोकलच्या समस्या अग्रक्रमाने सोडवल्याच पाहिजेत.आता सरकार काय पाऊलं उचलणार, याकडेच लक्ष आहे.

Read More