Padalkar To Jayant Patil: लोकसभा आणि विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदार-आमदारांचा सांगलीमध्ये सत्कार करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, विश्वजीत कदम, सत्यजित देशमुख एकाच मंचावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. सांगली जिल्हा ब्राह्मण समाजाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये काही वेळ उपस्थित राहून जयंत पाटील पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. मात्र याच कार्यक्रमात गोपीचंद पडळकरांनी ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद,हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं सांगितलं. तसेच पडळकरांनी आपल्या भाषणामध्ये जयंत पाटलांबद्दल एक सूचक विधान केलं असून हे विधान करताना पडळकरांनी अभिनेत्री केतकी चितळेचा उल्लेख केला.
"ब्राह्मण समाज आणि इतर समाजाचा वाद हा राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे," असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या मिरज येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना आपल्या भाषणात केलं. तसेच, "महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचा राज्यात सत्ता हमी योजनेचा कार्यक्रम सुरू आहे. त्यांना जेव्हा अडचण येते तेव्हा ते ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर समाजाची माथी भडकावून मतं मिळवतात आणि पै-पाहुण्यांचे राजकारण करतात", अशी टीका देखील आमदार पडळकर यांनी केली आहे.
"जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घेऊन केतकी चितळेप्रमाणे भूमिकेवर ठाम राहावे. नाहीतर सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात, अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही," अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर टीका केली आहे. तसेच, केतकी चितळेचा आदर्श घेत जयंत पाटलांनी भूमिका मांडावी असंही पडळकर म्हणाले. "ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आदर्श घ्यावा आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे त्यांनी केतकी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे," असं मत व्यक्त करत पडळकरांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे या सोहळ्याला आमदार जयंत पाटील यांनी देखील उपस्थिती लावत निघून गेल्यानंतर पडळकरांनी हे विधान केलं.
"अलीकडे वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे. आपल्या समाजातील आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणं ही पद्धत सुरू झाली आहे," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. "अशा व्यक्तीला समाज डोक्यावर घेतो आणि तो व्यक्ती समाजाचा नेता होतो. हे दुर्दैवाने या देशात पाहायला मिळत आहे,"अशी खंत देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त करत देशात आणि महाराष्ट्रात जाती जातीमध्ये द्वेष पसरत असल्याचे मत देखील व्यक्त केलं. तसेच, "नाना फडणवीस यांनी सगळ्यांना एकत्र करत ब्रिटिशांविरोधात लढाई केली हा देशातला सगळ्यात मोठा इतिहास महाराष्ट्राचा आहे. असा इतिहास अन्य राज्याचा नाही, त्यामुळे महाराष्ट्राचा मराठी माणूस सांगू शकतो की,या देशावर आम्ही राज्य केलं आहे," असंही जयंत पाटील यांवेळी म्हणालेय.