Goshala in Konkan: माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत गो शाळा उभारणार आहेत. यामुळे गोसंवर्धन होण्यासोबतच स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याची माहीती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 मे रोजी गोवर्धन गो शाळा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या तुलनेत एक वेगळी गो शाळा जिल्ह्यात होणार असल्याची माहिती नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंदू धर्मात गाय पवित्र मानले जाते. गाय म्हणजे समृद्धी. जिल्ह्यातील लोकांनी गाय पाळावी म्हणजे समृद्धीचा मार्ग येईल. म्हणून मी हा प्रयत्न करत असल्याचे नारायण राणे म्हणाले. गो शाळेत गाईच्या अनेक जाती असणार आहेत. जिल्ह्यातील लोकांनी दुधाचा व्यवसाय करण्याचे आवाहन राणेंनी यावेळी केले. कणकवीलीती करंजे गावात भव्य गोशाळा उभारली जाणार आहे. येथे दूध संकलनाची व्यवस्था केली जाणार असून 5 रुपये किलोने शेण घेतले जाणार आहे. तसेच गोमूत्रदेखील घेतलं जाणार आहे. खताची फॅक्टरीदेखील सुरु केली जाणार आहे. जिल्ह्यात शेणापासून रंग बनविण्याची फॅक्टरी तयार केली जाणार आहे. शेळी मेंढी प्रकल्पदेखील त्याच ठिकाणी असेल अशी माहिती राणेंनी यावेळी दिली.
1982 पासून मी मुंबईमध्ये कोंबडीचा व्यवसाय करत होतो. आतां भाऊ सांभाळतो. काही लोक माझा कोंबडीवाला म्हणून उल्लेख करतात. भ्रष्टाचार करण्यापेक्षा धंदा केलेला बरा. कोविड काळात भ्रष्टाचार झाला. मातोश्रीपासून नाव आहेत.सशक्त मूल झाली तर मेंदू चांगला होतो. प्रत्येक माणसाने योगदान दिल पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. पहलगाममध्ये जी घटना घडली त्याचं वाईट वाटतं. विरोधकांनी मोदींना जे समर्थन दिले मी त्यांचे कौतुक करतो. यावेळी त्यांनी शंकराचार्यांच्या विधानावार प्रतिक्रिया दिली. मी शंकराचार्य यांचा आदर करतो. तुम्ही देशापेक्षा मोठे नाही देशाच्या विषयावर त्यांनी भाष्य करू नये. त्यांना तो अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
राज्याचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. दोडामार्गमध्ये जिंदाल आणि अदानी यांच्यासोबत मी बैठका घेणार आहे. 500 कारखाने त्याठिकाणी येतील. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न साडे तीन लाख पर्यंत जाईल असा माझा प्रयत्न असेल असे राणे म्हणाले.
मी एवढ्या वर्षात कोणाला छळले, पैसे मागितले असतील तर सांगितल्यास मी पद सोडेन. विनायक राऊतने कोणत्या विषयात भ्रष्टाचार केला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. वैभव नाईक 10 वर्ष आमदार होते पण विधानसभेत बोलताना मी कधी बघितले नाही. उलट निलेशचे पहिल्या दिवशी कौतुक झाल्याचे ते म्हणाले.
अनेक योजना जिल्ह्यात जाहीर झाल्या. पण आल्या किती? ज्यांच्या काळात पैसे कमी आले असे ते मुख्यमंत्री असल्याचा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरेंना राज्यातील राजकारण काय कळत? असा प्रश्न त्यांनी विचारला. चुकीचे बोलले तर मी कानफटात मारेन. माझा स्वभाव जनतेला माहित आहे. आम्ही पाच वर्षात काही केल नाही तर मग बोला. नितेशने जो निर्णय घेतला तो निर्णय उद्धवने घेतलेला का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. लायकी नसलेला उद्धव बसलेला सत्तेत तेव्हा ड्रग्स का नाही बंद केले. गप्प बस वजन वाढवं आम्हाला वजन कमी करायला लावू नको. भविष्यात यांना पद मिळणार नाही ह्यांनी आमच्या वृद्धाश्रमात येऊन रहावे सगळा खर्च करु, असा टोला त्यांनी वैभव नाईक आणि विनायक राऊतांना लगावला. विरोधकांनी 10 वर्षात काय काम केल ते सांगा. जाहिराती लावा. पैसे मी देतो. या लोकांनी निकृष्ठ दर्जाची काम केली. मी त्याची तपासणी करायला लावलीय. मी मागे लागलो तर हात धुवून मागे लागतो
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणे बोलले आहेत. आवाहन देण्याचं दुकान कोणाचं? दोन भाऊ आम्हाला एकत्र आलेले नको का ? एकत्र या, असे राणे म्हणाले. एक भाऊ ( राज ठाकरे ) राजकारणात सक्रिय आहेत. दुसरा राजकारणातून संपत चाललाय. उद्धव ठाकरे गटाचे पाच आणि राज ठाकरे यांचे 20 आमदार बस एवढंच, असे यावेळी राणे म्हणाले.